सातारा : महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे सातारा-जावली विधानसभा संघाचे उमेदवार अमितदादा कदम यांच्या सातार्यातील प्रचाराने गती घेतली आहे. शहराच्या पश्चिम भागातून अमितदादा प्रचाराच्या निमित्ताने शहराचा कानाकोपरा ढवळून काढायला सुरुवात केली आहे. येथील गारेच्या गणपतीचे दर्शन घेत अमितदादा कदम यांनी सामान्य सातारकरांशी संवाद सत्र सुरू ठेवले आहे. या प्रचार मोहिमेला सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सातार्यामध्ये परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अमितदादा कदम यांनी प्रचाराची जोरदार आघाडी उघडली आहे. अमितदादा कदम यांनी सकाळच्या सत्रातच नागरिकांशी संवाद साधण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शहराच्या पश्चिम भागातून चिमणपुरा, ढोणे कॉलनी, मंगळवार पेठ, मोरे कॉलनी, केसकर कॉलनी, व्यंकटपुरा, गोखले हौद परिसर, गडकर आळी या भागांमध्ये कदम यांनी नागरिकांशी संवाद साधत आपली प्रचार मोहीम गतिमान केली आहे.
या प्रचारामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, उपशहर प्रमुख प्रणव सावंत, सातारा तालुका प्रमुख सागर रायते तसेच सर्व सहकारी हिरीरीने सहभागी झाले आहेत. येत्या 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी देण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न, सातार्यात प्रलंबित राहिलेली कामे तसेच सुविधांपासून वंचित असणारे सातारकर नागरिक अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करत अमितदादा कदम यांचा नागरिकांशी अखंड संवाद सुरू आहे. या संवाद सत्राला नागरिकांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील स्वच्छ चेहरा आणि उत्तम जनसंपर्क या निकषांवर महाविकास आघाडीने अमितदादा कदम यांना सातार्याच्या राजकीय आखाड्यामध्ये उतरवले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मशाल चिन्ह घेऊन दादांनी प्रचाराची आघाडी उघडली आहे.
येथील श्रावस्ती लॉन मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांची अमितदादा कदम यांनी बैठक घेतली. जिल्हाप्रमुख सचिन मोहिते हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अमितदादा कदम यांनी सचिन मोहिते यांच्याशी उत्तम संपर्क ठेवत सर्व नाराजांची समजून घातली. तसेच सर्व शिवसैनिकांनी सातारा व जावली तालुक्यातील आपली राजकीय ताकद अमितदादा कदम यांच्या पाठीशी उभी करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. त्यानुसार प्रभाग आणि वार्डात शिवसैनिकांचा शिस्तबद्ध प्रचार सुरू झाला आहे. सर्व शिवसैनिक एकाच झेंड्याखाली एकवटल्याने शिवसेना गटामध्ये गटामध्ये चैतन्य पसरले आहे. मतदारांचा पाठिंबा, शिवसैनिकांची एकी आणि उत्तम प्रचार या माध्यमातून आपण निश्चित विजयश्री खेचून आणू, असा विश्वास अमितदादा कदम यांनी व्यक्त केला आहे.