सातारा : आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा- जावली मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रश्न सोडवले, ग्रामस्थांच्या मागणीनुसार विकासकामे मार्गी लावली आहेत. कोणताही भेदभाव, गट-तट न मानता सर्वधर्म समभाव या धोरणाने शिवेंद्रसिंहराजे कार्यरत आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघाचा कायापालट केला असून आपल्या गावाचा विकास करणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
जकातवाडी ता. सातारा येथे महिलांशी संवाद साधताना सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी जाकतवाडीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी पारंपरिक पद्धतीने सौ. वेदांतिकाराजे यांचे हळद-कुंकू लावून स्वागत केले. आ. शिवेंद्रसिंहराजेंना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार महिलांनी यावेळी व्यक्त केला.
सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, महायुती सरकार हे गोरगरीब जनतेचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, माता-भगिनींचे सरकार आहे. सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे समाजातील तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचावले आहे. महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवून गोरगरीब जनतेला विकासाच्या प्रवाहात आणले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा चौफेर विकास झाला असून पर्यटनवाढ, रोजगार व व्यवसायवृद्धीला चालना मिळाली आहे. आगामी काळात आपल्या गावाचा, आपल्या भागाचा, आपल्या तालुक्याचा आणि आपल्या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण सर्वांनी शिवेंद्रसिंहराजेंना बहुमतांनी निवडून द्यावे, असे सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या.