सातारा : परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत जयंत उथळे यांनी लिहिलेल्या 'नाथपंथी संत ज्ञानेश्वर - ज्ञानसत्तेच्या राजकारणाचा तिमिरभेद' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दि. ११ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. येथील समर्थ मंदिर चौकातील यादोगोपाळ पेठेतील दैवज्ञ सांस्कृतिक भवनात मैत्री ग्रुप, साताऱ्याने या पुस्तक प्रकाशनाचे आयोजन केले आहे.
ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण, विद्रोही चळवळीचे संस्थापक सद्स्य सुबोध मोरे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे. हे पुस्तक पुणे येथील हरिती प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
'नाथपंथी संत ज्ञानेश्वर' या पुस्तकात जयंत उथळे यांनी संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रापासून विसाव्या शतकातील फॅसिझम विरोधी लढ्यापर्यंतचे ज्ञान समोर आणले आहे. ज्ञानेश्वरांचे जीवन, कार्याबाबतच्या अनेक गैरसमज दूर केले आहेत. ज्ञानेश्वर-तुकारामांचे मोठेपण व ऐतिहासिक कामगिरी मांडली असून, वारकरी संप्रदायाची चिकित्साही केली आहे. नाथ संप्रदायापासून सुरू झालेली भागवत धर्म परंपरा स्वातंत्र्य चळवळीतील मध्यवर्ती उदारमतवादी धारेशी कशी संबंधित आहे, हेही उजेडात आणले आहे.