सातारा : आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरल्याने सातारा पालिकेच्या वसुली विभागाने थकबाकीदारांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. वसुली विभागाने मंगळवारी थकबाकीप्रकरणी मल्हारपेठ येथील एक लॉज व तीन नळकनेक्शन खंडित करुन थकबाकीदारांना झटका दिला. मल्हारपेठ येथील एका मिळकतदाराची २ लाख ८८ हजार ७९२ रुपये घरपट्टी थकली आहे. नोटीस बजावूनही थकबाकी न भरल्याने मंगळवारी वसुली विभागाने संबंधित मिळकतदाराचे लॉज सील केले.
तसेच भवानी पेठ येथील रामचंद्र पिसाळ यांची १ लाख ९९ हजार ११४, शांताबाई इंगवले यांची ८४ हजार ८९० तर सदाशिव पेठ येथील जनार्दन साळुंखे यांची ७८ हजार ८२६ रुपये पाणीपट्टी थकीत आहेत. पालिकेने बजावलेल्या नोटीसीला कोणताही प्रतिसाद न दिल्याने संबंधित मिळकतदारांचे तीन नळ कनेक्शन खंडित करण्यात आले.मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या.
या कारवाईत कर अधिकारी उमेश महादर, वॉरंट अधिकारी अमित निकम, भाग लिपिक संजय कोळी, राजाराम लगड, रवी भाग्यवंत तसेच वरिष्ठ भाग लिपिक गणेश टोपे,राजेंद्र शेळके, अशोक चव्हाण, युवराज खरात, नितीन रणदिवे, अनिल बडेकर, तुकाराम गायकवाड व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नागरिकांनी थकीत कर भरुन कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.