नवी दिल्ली : पंजाब, हरियाणा, उत्तर भारतातील शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये पुन्हा एकदा धुमश्चक्री होणार आहे. मोदी सरकारच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. गेल्या 10 महिन्यांपासून शेतकरी सरकारच्या धोरणातील बदलाची प्रतिक्षा करत होते. गेल्या पाचहून अधिक वर्षांपासून या वादावर तोडगा काढण्यात मोदी सरकारला यश आलेले नाही. या आंदोलनावर जहरी टीका केल्याने उलट आंदोलन चिघळले होते. आज पुन्हा शेतकरी शंभू बॉर्डरहून दिल्लीकडे कूच करत आहे. शेतकर्यांचा पहिला जत्था, पहिली तुकडी दिल्लीकडे जाईल. त्यामुळे आजपासून दिल्ली सीमेवर पुन्हा महाभारत घडणार आहे.
पंजाबमधील शंबू बॉर्डरवर गेल्या 10 महिन्यांपासून शेतकरी डेरेदाखल आहेत. यापूर्वी मोदी सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण त्यात यशस्वी तोडगा निघाला नाही. आता शेतकरी पुन्हा दिल्लीकडे कूच करतील. शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी सांगीतले की, 101 शेतकऱ्यांचा एक गट आज 6 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता शंभू बॉर्डरकडे कूच करतील. हा जत्था दिल्लीकडे मार्च करेल. मोर्चा घेऊन जाईल. आता तरी सरकारला जाग येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शंभू बॉर्डरवर माध्यमांशी संवाद साधताना पंढेर यांनी सरकारवर निशाणा साधला. आम्ही दुपारी एक वाजता शंभू बॉर्डर येथून दिल्लीकडे मोर्चा घेऊन जाणार आहोत. जर सरकार आमचा मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न करतील तर तो आमचा नैतिक विजय असेल. यापूर्वी आम्ही ट्रॅक्टर घेऊन दिल्लीकडे मार्च काढला होता. त्यावेळी अनेकांनी आमच्यावर टीका केली होती. आमच्या वेदना कोणी पाहिल्या नाहीत. आता आम्ही पायी मोर्चा घेऊन जात आहोत. आता तरी कुणालाच आमच्याविषयी अडचण नसावी. आम्हाला थांबवण्याचे काही कारण नसावे.
यावेळी सरवन सिंह पंढेर यांनी केंद्र सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. साध्या शेतकर्यांना हे सरकार इतके का घाबरत आहे, असा सवाल त्यांनी केला. पंजाब-हरियाणा सीमा रेषा आता पूर्वीप्रमाणे दिसत नाही. उलट हे एखादं आंतरराष्ट्रीय बेट असल्याचं जाणवतं, असा खोचक टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला. आम्ही जणू शत्रू राष्ट्राचे नागरिक आहोत, असा व्यवहार केंद्र सरकार आमच्याशी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.