पहलगाम हल्ल्यानंतर केदारनाथ धामचे दरवाजे कडेकोट बंदोबस्तामध्ये उघडले

by Team Satara Today | published on : 02 May 2025


उत्तराखंड : जम्मू काश्मीरमध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामध्ये जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

केदारनाथ धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. यामुळे भाविकांमध्ये एकच उत्साह आहे. मात्र नुकत्याच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये एक प्रकारे भीती देखील निर्माण होण्याची शक्यता होती. याच पार्श्वभूमीवर केदारनाथमध्ये कटेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र केदारनाथमध्ये पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यामुळे दहशतवादी हल्ल्यांना एकप्रकारे भारतीयांनी चपराक लगावली आहे.

आज (दि.02) केदारनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत. सकाळी सात वाजता केदारनाथ धाम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. हिवाळ्यामध्ये केदारनाथमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होत असते. यामुळे मंदिर परिसरामध्ये बर्फाचा अक्षरशः खच पडलेला असतो. यामुळे केदारनाथ धाम हे सहा महिन्यांसाठी बंद असते. यानंतर मंदिर सुरु होते. भाविकांसाठी आता मंदिरे खुले करण्यात आले आहे. त्यापूर्वी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आणि आरास करण्यात आली. याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

बाबा केदारनाथ यांचा पंचमुख चलविग्रह उत्सव पालखी सोहळा देखील पार पडला आहे. गुरुवारी (दि.01) दुपारी ही पालखी भगवान केदारनाथाच्या जयघोषामध्ये केदारनाथमध्ये दाखल झाली होती. भोलेनाथांच्या दर्शनासाठी १५ हजार भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले होते. यासाठी गुरुवारी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. ‘हर हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषात केदारथाम दुमदुमून गेलं. यानिमित्त केदारनाथ मंदिर 108 क्विटल फुलांनी सजवण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ धाम येथे देखील सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. यामुळे यात्रेकरूंसाठी पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंदिराच्या ३० मीटर परिघात मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे मंदिर परिसरात रील शूट करताना, फोटो काढताना कोणी आढळल्यास मोबाइल जप्त केले जातील, तसेच ५,००० रुपयांचा दंड वसूल केला जाईल, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात गुलमोहर महोत्सवाची मुक्तहस्ते उधळण
पुढील बातमी
भारताविरोधात ५७ देश

संबंधित बातम्या