लोकांच्या हिताचे आणि विकासाचे राजकारण मी केले : आ.जयकुमार गोरे

म्हसवड येथे अप्पर तहसिल कार्यालय व विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा

by Team Satara Today | published on : 15 October 2024


सातारा : ज्यांच्याकडे सांगण्यासाठी काही नसते, त्यांना काही ना काही कृप्त्या लढवाव्या लागतात. मी माझ्या मतदारसंघात एवढे काम केले आहे की मला विरोधकांबाबत बोलण्यासाठी वेळ नाही. लोकांच्या हिताचे आणि विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळेच मतदारसंघातील माझ्या बहिणी, नागरिक माझ्यावर प्रेम करीत आहेत. तसेच रामराजे कधीच कोणाचे नाहीत. शरद पवारांनी त्यांना नाव दिले, त्यांना त्यांनी सोडले. अजित पवारांनी त्यांना भरीव विकासनिधी देवूनही त्यांनी अजितदादांबरोबरही गद्दारी केली, असे स्पष्ट प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, म्हसवड शहराला आदर्श शहर बनवण्यासाठी सर्वांगीण विकास साधत आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. म्हसवडसह परिसरातील 47 गावातील नागरीकांचा वेळ व पैसा वाचवत त्यांना ग्रामीण भागातून शासकीय विविध कामांसाठी दहिवडीला जावे लागू नये, यासाठी म्हसवड येथे अप्पर तहसिल कार्यालय आणण्यासाठी आपण अथक प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश आले आहे. या कार्यालयामुळे नागरीकांची सोय झाली असून शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यास याची मदत होणार असल्याचे प्रतिपादन

 म्हसवड ता.माण येथे आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा उद्घाटन समारंभ तसेच म्हसवड शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सौ.सोनिया गोरे, माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर, अर्जुन काळे, अरुण गोरे, डॉ.संदीप पोळ, दादासाहेब काळे, अतुलदादा जाधव, शिवाजीराव शिंदे, विलासराव देशमुख, प्रांत उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, मुख्याधिकारी सचिन माने, हरिभाऊ जगदाळे, सोमनाथ भोसले, किसन सस्ते, गणेश सत्रे, आप्पासाहेब पुकळे, विशाल बागल, सिद्धार्थ गुंडगे, नितीनभाई दोशी, विजय धट, डॉ.मासाळ, सुनील पोरे, गुलाब कट्टे, विष्णुपंत कट्टे, सतीशशेठ जगदाळे, बाळासाहेब मासाळ, सचिन होनमाने, अकील काझी, बाळासाहेब पिसे, ऍड.दत्तात्रय हांगे, म्हसवड नगरीतील आजी-माजी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, माण तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवाजीराव शिंदे, अर्जुन काळे आदींनी मनोगते व्यक्त केली.

आ.जयकुमार गोरे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांपासून मी माण-खटावमधील नागरिकांची सेवा करीत आहे. कायम दुष्काळी असणार्‍या या भागाला सुजलाम सुफलाम करण्याचा मी चंग बांधलेला आहे. राजकारणापेक्षा दुष्काळमुक्तीची लढाई माझ्यासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येक समाजाला न्याय देण्याची आपण कायम भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्व समाजाच्या विविध विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. अहिल्यादेवी स्मारक, महात्मा फुले परिसर सुशोभीकरण, बौद्ध समाजासाठी भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन, मातंग समाज सभागृह ग्रंथालय, अण्णा भाऊ साठे पुतळा व समाज मंदिर, नाभिक समाज सभागृह, नागोबा मंदिर सभागृह, माळी समाज सभागृह अशी प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली. खाणीत सुंदर असे सभागृह बांधणार आहे. त्या स्मारकापुढे भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार आहे. बगीचा दुरुस्ती साठी कोट्यवधींचा निधी आणला. तहसील कार्यालय सुरु झाले. आता रजिस्टर कार्यालय लवकर करणार. त्याद्वारे गावचा विकास होईल. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी एमआयडीसी होणार आहे. चार महिन्यांनंतर 24 तास पाणी शहरवासीयांना मिळणार असून यासाठी 90 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना फक्त 72 तासांत मंजूर करुन आणली आहे. म्हसवडकरांनी कायम साथ देत प्रेम दिले आहे. नाथनगरीचे प्रचंड उपकार आहेत. त्यामुळे विविध कामाच्या माध्यमातून जनतेची उतराई करतोय. माता बहिणींच्या सेवेत असाच कायम राहीन, असेही त्यांनी सांगितले.

 

गोंदवलेच्या सरपंचाचा पक्षप्रवेश...
म्हसवड येथील कार्यक्रमादरम्यान गोंदवले बुद्रुक सरपंच जयप्रकाश कट्टे, वाघमोडेवाडीचे माजी सरपंच सयाजी वाघमोडे यांनी कार्यकर्त्यांसह आ.जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महापुरुषांची चळवळ ॲक्शनपोजवर हवी : वामनराव म्हस्के
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात 26 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

संबंधित बातम्या