सातारा : सातारा आणि शाहूपुरी या दोन भागांना जोडणाऱ्या गेंडामाळ नाका परिसरातील टपऱ्यांची अतिक्रमणे सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने आज हटवली. या चौकात टपऱ्यांची गर्दी होऊन अपघाताचा धोका वाढल्याने ही कारवाई करण्यात आल्याची मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितले आहे.
सातारा शहरातील टपऱ्यांचे अतिक्रमणआणि त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी हा सध्या सातारा शहरासाठी संवेदनशील विषय बनला आहे .या संदर्भात ठोस उपाय योजना राबवण्याकरता वाहतूक आराखडा बनवला जात असून सातारा पोलीस आणि सातारा नगरपालिका समन्वय आणि त्याची लवकरच अंमलबजावणी करणार आहे . प्रभारी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या निर्देशाप्रमाणे अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांना काही नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीमुळे येथील टपऱ्यांची अतिक्रमणी हटवण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले होते.
शहर विकास विभाग अंतर्गत काम करणारे अतिक्रमण हटाव अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि दहा कर्मचारी असे पथक घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पाणीपुरवठा विभाग आणि शहर विकास विभाग दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने सक्रिय होते. गेंडामाळ नाक्यावर शाहूपुरी तसेच अर्क शाळा नगरंकडून फाशीच्या वडाकडे जाताना तीव्र उताराने येणारी वाहने लक्षात येत नाही त्यामुळे या चौकामध्ये अपघाताचा धोका वाढला होता.
नगरसेवक विश्वतेज बालगुडे यांनी यासंदर्भात तक्रार दिल्याने सातारा पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग ॲक्शन मोडवर आला. त्यांनी घटनास्थळी येऊन या पथकाने येथील दोन टपऱ्या तात्काळ हटवल्या. यावेळी येथील कर्मचारी आणि टपरी चालक यांच्यामध्ये काही काळ वादावादी झाली. सातारा शहर परिसरात वाहतूक कोंडी करणाऱ्या टपऱ्यांचे तिक्रमण याच पद्धतीने काढली जातील, असा इशारा प्रभारी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिला आहे.