सातारा : राज्य सरकारच्या 15 टक्के बस दरवाढीच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. भाडेवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. लालपरीचे भाडे वाढल्याने प्रवाशांवर अतिरिक्त भुर्दंड पडत आहे, भाडेवाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी केली. राज्य शासनाचा निषेध व्यक्त करत एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, परिवहन मंत्री हाय.. हाय.. अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
राऊत म्हणाले, राज्य शासनाने केलेली भाडेवाढ अन्यायकारी आहे. दोन महिन्यापूर्वी एसटी महामंडळ फायद्यात असल्याचे महामंडळाचे अध्यक्षांनी सांगितले होते. असे असताना एसटीची भाडेवाढ होणे म्हणजे सर्वसामान्य माणसाची राज्य सरकार लूट करत आहे. दुर्दैव म्हणजे राज्याच्या परिवहन मंत्र्यालाच सदरील भाडेवाढ करण्यात आली असल्याची माहिती नसणे धक्कादायक असल्याचे राऊत म्हणाले. ही भाडेवाढ नियमाला धरून नाही. थोड्याफार प्रमाणात भाडेवाढ सामान्य नागरीक समजू शकतो. मात्र महामंडळ फायद्यात असताना अशा प्रकारे भाडेवाढ करणे शासनाचे अन्यायकारी धोरण असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली. राज्य सरकार अनेक अमिषे देत वायफळ खर्च करतं आहे. अशा वेळी भाडेवाढ करणे योग्य आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. परिवहन खात्याच्या मंत्र्यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर सुरुवातीला चमकोगिरी केली. एसटीने प्रवास केला. मात्र त्यांना प्रवाशांची व्यथा कळलीच नाही, असा टोला राऊत यांनी प्रताप सरनाईक यांना लगावला. श्रीमंत नव्हे तर सर्वसामान्य माणूस या एसटीने प्रवास करतो. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील प्रवाशांच्या मुख्य प्रवासाचे साधन एसटी बस आहे. आज फक्त बसस्थानकाच्या गेटवर बस काही काळ थांबवून चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. आगामी काळात राज्यभर पक्षाच्यावतीने चक्काजाम करून या शासनाला भाडेवाढ रद्द करण्यास भाग पाडू, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.
यावेळी उप जिल्हा संघटक सादिकअली बागवान, रवी चिकणे, विशाल जाधव, सचिन जगताप, किरण कदम, अनिल गुजर, गणेश किर्दत, सतीश पाटील, गणेश जांभळे, सुहास देशमाने, अजित पुरोहित, दशरथ धोत्रे आदी उपस्थित होते.