मतदानावर बहिष्काराचा निर्धार करताच प्रशासन हलले !

by Team Satara Today | published on : 09 November 2024


छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या काळापासून सिंहगड किल्ल्याच्या रक्षणासाठी राबणार्‍या गडाच्या पायथ्याच्या कल्याण मोरदरीजवळील घेरा सिंहगड ग्रामपंचायत हद्दीतील सुभेदार बहिर्जी नाईक रामोशी वस्तीसाठी स्वातंत्र्यानंतरही रस्ता नसल्याने संतप्त रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार करताच प्रशासनाने रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा प्रशासनाने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना हवेली तालुका तहसीलदारांना दिल्या. याबाबत हवेली तालुका तहसीलदार किरण सुरवसे यांनी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 138 अंतर्गत संबंधित जागा मालकांना नोटीस बजावली आहे.

तहसीलदारांच्या उपस्थित दि. 9 नोव्हेंबर  रस्त्याची समक्ष पाहणी करण्यात येणार आहे. याबाबत हवेली तालुका तहसीलदार किरण सुरवसे म्हणाले, शनिवारी रस्त्याची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कार्यवाही करण्यात येणार आहे.

रस्त्याअभावी बहिर्जी नाईक रामोशी वस्तीतील शेकडो रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्यकर्ते, प्रशासन वर्षानुवर्षे केवळ आश्वासन देत आहेत. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.

याबाबत निवडणूक अधिकारी व पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना घेरा सिंहगडचे उपसरपंच गणेश गोफणे व रहिवाशांनी निवेदन दिले. उपसरपंच गणेश गोफणे म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही वस्तीत प्रशासनाने जाण्यासाठी रस्ताच केला नाही. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही दखल घेतली नाही. रस्त्याच्या जागेची पाहणी करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून कागदावरच असलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

बारमाही रस्ता नसल्याने रामोशी वस्तीतील रहिवाशांना शेताच्या बांधावरून तसेच बिकट पायवाटेच्या काटेरी झुडपातून, ओढे-नाले ओलांडून दररोज ये-जा करावी लागते. पावसाळ्यात ओढ्याला पूर येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. गंभीर आजारी रुग्णांचे वेळेवर उपचार न मिळाल्याने बळी जात आहेत. हवेली तालुका तहसीलदारांनी यापूर्वी पाणंद रस्त्याच्या पाहणीसाठी अनेकदा नोटीस बजावल्या. मात्र, प्रत्यक्षात पाहणीसाठी तहसीलदार व महसूल अधिकारी एकदाही फिरकले नाहीत. आता मात्र तहसीलदार समक्ष पाहणी करणार असल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संविधान कोणीही बदलू शकणार नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
पुढील बातमी
आचारसंहितेचा बागुलबुवा नको

संबंधित बातम्या