सातारा : 26/11 मुंबई हल्ल्यामधील कर्तव्य बजावताना शहीद झालेले अशोक चक्र सन्मानित पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांचे केडंबे तालुका जावळी येथे स्मारक उभारण्याच्या कामासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. या स्मारकासाठी 13 कोटी 46 लाख 34 हजार दोनशे एक रुपयांचा निधी प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रथम टप्प्यातील कामासाठी दोन कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी यांना नियंत्रण अधिकारी, तर जिल्हा नियोजन अधिकारी यांना संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
राज्य शासनाने केडंबे तालुका जावळी येथील अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे यांच्या जन्मगावी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. मात्र निधी अभावी हे काम रखडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त विभागाच्या मान्यतेनंतर या स्मारकासाठी 13 कोटी 46 लाख 34 हजार दोनशे एक रुपयाचा निधी प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच स्मारक बांधकामासाठी प्रथम टप्प्यात प्रशासकीय मान्यतेच्या 20% म्हणजे 2 कोटी 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या कामाला गती मिळाली असून केडंबेवासीयांसाठी ही समाधानाची बाब ठरली आहे. स्मारकाच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन अधिकारी हे संवितरण अधिकारी तर जिल्हाधिकारी म्हणून नियंत्रण अधिकारी घोषित करण्यात आले आहेत
स्मारकावरील खर्चाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहणार असून कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्यावर स्मारक पूर्ततेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्मारकाच्या कामाची प्रगती व उपयोगिता प्रमाणपत्र तसेच महालेखापालांच्या लेखाशी खर्चाचा ताळमेळ याबाबत समन्वय साधण्याची जबाबदारी संयुक्तपणे देण्यात आली आहे. नियोजन आणि वित्त विभागाच्या मान्यतेने याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव का. गो. वळवी यांनी याबाबतचा हा आदेश निर्गमित केला आहे.