सातारा : शाळा माऊली ही कर्तबगार व्यक्ती घडवण्यात अग्रेसर असून गेली सव्वाशे वर्षे आपली ही शाळा खरोखरच संपूर्ण राज्यात नव्हे तर प्रांतात एकमेव अशी शाळा आहे जी कर्तबगार असे शिल्पकार घडवत आहे आपण गुरुजन ,आई, वडील यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करूया कारण ही शाला माऊली ही संस्कारांची शाळा आहे असे उद्गार कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी काढले .
येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सातारा सध्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरी करत आहे. या विद्यालयाचा 101 वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून शेजवळ बोलत होते. यावेळी विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. विश्वस्त अनंत जोशी ,सदस्य सारंग कोल्हापुरे ,नितीन पोरे यांचेसह शालाप्रमुख सुजाता पाटील, उपशाला प्रमुख दत्तात्रय भोसले, पर्यवेक्षक राजेश सातपुते, जर्नादन नाईक, सौ. अनिता कदम, डॉ.कविता गायकवाड, सोहळ्याचे कार्याध्यक्ष श्रीनिवास कल्याणकर, उपकार्याध्यक्ष सुधाकर गुरव, शाळेच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी आर्या गुरव व विद्यार्थी प्रतिनिधी अवधूत खुटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलनाचा प्रारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला त्यानंतर ईशस्तवन व स्वागत गीत सचिन राजोपाध्ये व शालेय विद्यार्थ्यांनी सादर केल्यावर आपल्या प्रास्ताविक भाषणात शाळा प्रमुख सुजाता पाटील यांनी शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातील विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला व या स्नेहसंमेलनाचे अवचित्य हे वेगळे असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले.
शाळेचे कलाशिक्षक घनश्याम नवले व संदीप माळी यांनी अतिशय आकर्षकपणे बनवलेल्या या सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे गरुडाच्या रूपातील शिल्पाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या दोन्ही कला शिक्षकांनी बनवलेल्या थ्रीडी इमेज मधील अतिशय आकर्षक अशा चित्र शिल्पाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .प्रमुख पाहुण्यांचा परिचय संमेलनाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास कल्याणकर यांनी करून दिला. त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला.
अहवालाचे वाचन पर्यवेक्षक राजेश सातपुते सर यांनी केले. कु.जान्हवी देशपांडे यांनी पारितोषिक वितरण समारंभातील गुणवंत तसेच विविध विषयात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विविध शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच माजी विद्यार्थ्यांच्या गौरवांच्या बक्षीस पत्राचे वाचन केले.
प्रमुख पाहुणे डॉ.राजेंद्र शेजवळ यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात शाळामाऊलीने मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून खरोखरच एक विशेष आनंद दिला आहे. मी या शाळेचा 1976- 77 च्या बॅचचा माजी विद्यार्थी होतो. माझ्या जुन्या आठवणींना या कार्यक्रमामुळे उजाळा मिळालेला आहे. शाळा माऊली ही कर्तबगार व्यक्ती घडवण्यात अग्रेसर असून गेली सव्वाशे वर्षे आपली ही शाळा खरोखरच संपूर्ण राज्यात नव्हे तर प्रांतात एकमेव अशी शाळा आहे, जी कर्तबगार असे शिल्पकार घडवत आहे. आपण गुरुजन, आई-वडील यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करूया, कारण ही शाला माऊली ही संस्कारांची शाळा आहे. आज या शाळेचे शिक्षक हे शिल्पकाराच्या भूमिकेत असून स्वराष्ट्र घडवण्याचे कार्य ते करत आहेत प्रत्येकाने आपल्यातील आत्मबल जागे करा जागृत व्हा स्वतःला ओळखा कारण आपणच मन मनगट आणि मेंदू प्रखर करून देश घडवूया.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी म्हणाले की, शालामाऊलीची ही पुण्याई आहे की व्यासपीठावर जे मान्यवर बसले आहेत ते सर्वजण शाळेचे विद्यार्थी आहेत. गेली 125 वर्षे शाळा माऊली विद्यार्थी घडवण्यासाठी धडपड करत आहे. त्या सर्व शिक्षक बंधू, भगिनींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. गुणवान, कलावान आणि क्रीडा क्षेत्रात कौशल्य मिळवून त्यांना अशा गौरवपूर्ण वाटचालीसाठी मी सर्व मुला-मुलींना शुभेच्छा देतो. अभ्यासावर लक्ष केंद्रित करून तुम्हीच तुमचे भविष्य घडवा आणि ते तुमच्या हातात आहे, अशा शब्दात सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपकार्यध्यक्ष सुधाकर गुरव यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अपर्णा जाधव यांनी केले.
यावेळी पालक शालेय शिक्षक, शिक्षिका तसेच कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचारी वृंद कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर अतिशय रंगतदार झालेल्या रंजन कार्यक्रमांमध्ये गणेश वंदना, लोकसंगीत, गोंधळ नृत्य, रामायणावर आधारित भारतीय संस्कृती, चक दे इंडिया, झाडाचे आत्मवृत्त नृत्यासह शिक्षक व पालकांचे योगदान दाखवणारा सांघिक नृत्य प्रकार, देशभक्तीपर नृत्य आणि मंगळागौर सादर होत ..राम सियाराम.. या नृत्यातून कार्यक्रमाची सांगता झाली. या रंजन कार्यक्रमाचे संयोजन सौ. मनीषा सुपे तसेच म.ना.मोरे, श्री. घाडगे, सारिका सपकाळ ,सौ. चाफेकर आदींचे होते.