सातारा : चहा विकणारे आपल्या देशाचे पंतप्रधान होवू शकतात. रिक्षा चालवणारे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होवू शकतात. तर आपण देशाची सेवा करणारे सैनिक आहोत. आपणामध्ये देशहित बाळकडू आहे. हिंदूत्वाची आस आहे. हिंदूत्वावर प्रेम आहे. सैनिकांच्या समस्या, सैनिकांच्या अडचणी, सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची धमक फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे, असे मत सैनिक आघाडीचे राज्याचे अध्यक्ष मनोज डांगे यांनी व्यक्त केले.
साई मंगल कार्यालयात आयोजित शिवसेनेच्या सैनिक आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सैनिक आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष कांतिलाल होळ, इंद्रजित भिलारे, डॉ.संजय लावड, सुर्यकांत पडवळ, निलेश निकम, संजय निंबाळकर, संजय खापे, सचिन साबळे, रासकर, प्रवीण शिंदे, अरुण जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मनोज डांगे म्हणाले, आपण सगळे देशसेवेत असताना एक सैनिक होतो आता शिवसैनिक आहोत. भविष्यात पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर जिह्यातील सैनिकांचे प्रतिधित्व असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाच वर्षात क्रांती होणार आहे. सैनिकांचे प्रश्न सुटणार आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
इंद्रजीत भिलारे म्हणाले, कोणी देशाची 15 वर्ष केली कोणी 22 वर्ष कोणी 32 वर्ष केली. त्यानंतर प्रत्येक सैनिक सेवानिवृत्त झाल्यानंतर आपाआपल्या मार्गाला लागला आहे. आपण आजीमाजी सैनिकांच्यासाठी वेळ देवूयात. विधानसभा निवडणूकीत सातारा जिह्यासह राज्यात महायुतीचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करुयात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुर्यकातं पडवळ यांच्यासह मान्यवरांनी आपली मते मांडली. नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संघटनेचे महत्व आणि सैनिकांची एकी अशीच कायम ठेवूयात असे आवाहनही राज्याचे अध्यक्ष डांगे यांनी यावेळी मांडले आणि हिंदूत्व असणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल सुरु आहे. सैनिकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून पक्षीय पातळीवर प्रयत्न केले जातील, त्यासाठी शिवसैनिक म्हणून एकीची वज्रमुठ आवळली गेली पाहिजे. येवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीत सैनिकांच्या जिह्यात आपली ताकद दाखवून देवू. आपले अस्तित्व दाखवून देवू, असे ते म्हणाले.