सातारा : मुलगी युवकासोबत पळून गेली असून तिने विवाह केल्याचे समोर आल्यानंतर आईने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी सातारा तालुक्यात घडलेल्या घटनेने समाजमन गलबलून गेले आहे.
सातारा तालुक्यातील एका गावातील 19 वर्षीय युवती पळून गेली. पोटचा गोळा दिसत नसल्याने कुटुंबीय सैरभैर झाले. शोध घेतल्यानंतरही तिचा रात्रभर पत्ता लागला नाही. ती एका युवकासोबत पळून गेल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर आईचे मन तिला खायला उठले. या नैराश्यातूनच जन्मदात्रीने पहाटे विषारी औषध प्राशन केले. कुटुंबीयांनी उपचारासाठी आईला दाखल केले. एकीकडे आईची जीवन मरणाची लढाई सुरू होती. तोपर्यंत दुसरीकडे पळून गेलेली युवती सातारा तालुका पोलिस ठाण्यात नवविवाहित पतीबरोबर हजर झाली.
पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केलेली नव्हती. जोडपं हजर झाल्याने पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना फोन केला. त्यावर मुलीच्या आईने विष पिल्याने ‘आम्ही कोणीही पोलिस ठाण्यात येवू शकत नाही,’ असे कळवले. यामुळे मुलगी पतीसोबत तेथून निघून गेली. इकडे सोमवारी सकाळी आईने रुग्णालयात सर्वांचाच निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली.
सातारा तालुका पोलिस ठाण्यात महिलेच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी माहिती घेतली. युवतीचे मुलासोबत प्रेम होते. सुमारे सहा महिन्यांपूर्वी तिने मुलासोबत विवाह केला आहे. अशातच ती पळून गेल्याने आईला अतीव दु:ख झाले. कौटुंबीक कारणामुळे महिलेला नैराश्य आले होते.