सातारा : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाआड येणार्या सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म, जुगाराचे ऍप, ऑनलाईन गेम्स वर निर्बंध घालण्यात यावेत, अशी मागणी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट-गुरुकुल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही गेल्या तीन-चार दशकांपासून सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करीत आहोत. या अनुषंगाने सद्य परिस्थितीत मोबाईल, सोशल मिडीया, वेब सिरीज आणि त्याचा गैरवापर यामुळे मुलांच्या मेंदुवर, शरीरावर आणि मनावर होणारे दुष्परिणाम आम्हाला दिसून येत आहेत.
अलीकडच्या काळात वरील बाबींमुळे अल्पवयीन आणि तरूण पिढीवर वाईट परिणाम होताना दिसत आहेत. हे भारताच्या भविष्याच्या दृष्टीने फारच गंभीर आहे. दिवसेंदिवस मुलांचे मेंदू सोशल मिडीया आणि त्यावरील अनेक प्स तसेच ऑनलाईन गेम्स’ यावर मादक पदार्थांच्या परिणामांसारखे अनेक मुलां बरोबर तरुणांच्या बाबतीत घडताना दिसून येत आहे. यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
मोबाईल, सोशल मीडियामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे, शिकवलेले न समजणे, लक्षात न राहणे, चिडचिड होणे, खोटे बोलणे, मुले एकलकोंडे होणे, व्यसनाची सवय लागणे, घरातील पैशाची चोरी करणे, त्याच अनुषंगाने गुन्हेगारीकडे वळणे, वडिलधार्या लोकांचा आदर न करणे, अल्पवयात लैंगिक आकर्षण निर्माण होणे, नात्यांचा अनादर करणे, हार्मोनल बदल वेळेच्या अगोदर होणे, चंगळवाद वाढणे, सोशल मीडियाद्वारे फसवणूक करणे, चुकीच्या लोकांना आपला आदर्श मानणे, अश्लील व्हिडीओ व वेब सिरीज पाहणे, दिवसातून अनेक तास मोबाईलवर राहण्यामुळे वाढत चाललेले शारीरिक आजार अशा अनेक गोष्टी या सोशल मिडीया, त्यावरील जुगाराचे ऍप, नको त्या गेम्स यामुळे मुलांच्या मेंदुवर आणि बालमनावर अंमली पदार्थांसारखे दुष्परिणाम होत आहेत. ओघाने मुलांमध्ये अहंकार वाढत असून भावना कमी होत आहेत. यासर्व बाबींमुळे कुटुंबातील दरी वाढून समाजाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. हे सर्व कधीही न भरून येणारे दुष्परिणाम आहेत.
आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, शिक्षकांनी, आईवडीलांनी कितीही चांगले शिक्षण आणि संस्कार दिले तरीही काहीही उपयोग होताना दिसत नाही. विशेष म्हणजे या ऍप्सच्या जाहिराती मोठमोठे सेलिब्रिटी राजरोसपणे टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावर करीत असून त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत.
भारताने आर्थिकदृष्ट्या कितीही प्रगती केली, तरी देश सांभाळणारी पिढीच जर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाली, तर आपल्या देशाला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणून भारत सरकारने, राज्यसरकारने भारताची भावी पिढी वाचविण्यासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गांभीर्याने सर्वात प्रथम ज्यामुळे जनतेचे लाखो तास वाया जात आहेत, अशा सोशल मिडीयावरील ऍप्स यांसारख्या बाबींवर काही निर्बंध घालून 18 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मिडीया, ऍप, गेम्स व चुकीच्या वेब सिरीजवर बंदी घालावी.
अनेक प्रगत राष्ट्रांनी आपल्या पौगंडावस्थेतील मुलांवर होणार्या दुष्परिणामांची नोंद घेत अनेक समाजमाध्यमांवर बंदी घातलेली दिसून येते. त्यासाठी कायदेसुध्दा कार्यरत केलेले आहेत. उदा. - स्वीडन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, नॉर्वे, फिनलँड यांसारख्या देशानी आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये बदल केलेले आहेत.
आपण आपल्या देशात कधी जागृत होणार ? आम्हाला असे वाटते की आपल्या किशोरवयीन मुलांसाठी तसेच तरूणाईसाठी आपण योग्यवेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठीच आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे असे वेगवेगळे मीडिया, जुगाराचे ऍप, ऑनलाईन गेम्स वर निर्बंध घालावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर राजेंद्र चोरगे, डॉ. चित्रा दाभोलकर, डॉ. अदिती काळमेख, अतुल शहा, प्रशांत पवार, सौ. स्नेहा टाकेकर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.