सातारा : सातारा शहराध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असताना भाजप शहर कार्यकारणी मधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. 25 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या बांधणीसाठी सक्रिय असणार्या जुन्या निष्ठावंतांना काहीजण विश्वासात घेत नसल्याची तक्रार भाजपचे सक्रिय सदस्य, अयोध्या फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक विजय काटवटे यांनी केली आहे. काही जणांच्या कार्यपद्धतीमुळे पक्ष उगाच बदनाम होत असल्याची तक्रार त्यांनी केली.
सातारा शहरासह इतर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने नव्या दमाचे शहराध्यक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये बूथ प्रमुख, मंडल प्रमुख तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांचा अहवाल घेऊन त्याबाबतची सविस्तर मांडणी जिल्हा कार्यकारणीच्या माध्यमातून प्रदेश कार्यकारणीला केली जाणार आहे. मात्र सातारा शहरात सारे काही ऑल इज वेल नसल्याचे दिसून आले. शहराध्यक्ष पदासाठी वय वर्ष 30 ते 45 वयोगटाचा निकष ठेवून त्या अंतर्गत केवळ पक्षाच्या वीस जणांच्या प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत. यावर भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विजय काटवटे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
ते म्हणाले, ज्यांनी 25 वर्षे पक्षाच्या बांधणीसाठी तळमळीने कार्य केले, त्यांना का डावलले जात आहे ? भारतीय जनता पार्टीने प्रत्येकाला जबाबदारी नेमून दिलेली आहे. मात्र संघटना बांधणीमध्ये ज्यांचे सक्रिय योगदान आहे त्यांची मते डावलली जात आहेत. शहराध्यक्ष पदासाठी 30 ते 45 वयोगटाचा निकष असून त्यासाठी केवळ 20 सक्रिय सदस्यांच्या प्रतिक्रियांचा अहवाल जिल्हा कार्यकारणीकडे पाठवला जाणार आहे. यावर तीव्र आक्षेप नोंदवत काटवटे यांनी काही वरिष्ठ पदाधिकार्यांना विचारणा केली असता त्यांना न पटणारी उत्तरे देण्यात आल्याचा आरोप काटवटे यांनी केला. ज्यांनी पक्षबांधणीत सक्रीय योगदान दिले त्यांना जर डावलले जात असेल तर उपयोग काय आमच्या योगदानाचा? पक्षाने याबाबत जरूर विचार करावा. शहराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये फक्त 20 लोकांच्याच प्रतिक्रिया का आणि त्या निकषांमध्ये आम्ही का बसत नाही? याचा तातडीने खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.
काटवटे यांच्या या आरोपांमुळे भाजप शहर कार्यकारणीच्या निवड प्रक्रियेत वादावादी समोर आली आहे. काही ठराविक कार्यकर्ते पुढारपणा करत असल्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अडचणी होतात, असा सूर खाजगीमध्ये काहीजणांनी आळवला आहे.