सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी, देशातल्या प्रत्येक समाजसमुहासाठी अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिले असून त्यांची प्रेरणा ही उज्वल भरतासाठी अन्यनसाधारण आहे. त्यांची प्रेरणा घेऊन नवी पिढी घडत असून आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे, अशी भावना याशनी नागराजन यांनी व्यक्त केली.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी सकाळपासूनच लोक हायस्कूलमध्ये येऊन अभिवादन करत होते. मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी ११ वाजता होता, मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तब्बल पावणे दोन तास उशीरा आल्या. त्यामुळे कार्यक्रमस्थळी तहानभूकेने व्याकूळलेल्या विद्यार्थ्यांना मात्र हतबल अशा अवस्थेत बसून रहावे लागले. शिवाय शेकडो आंबेडकर अनुयायी कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नाराज होऊन परत गेले.
विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांचा शाळा प्रवेश दिनानिमित्त महाराष्ट्रभर प्रसारित झालेला 'सिम्बॉल आॕफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हा कार्यक्रम मुख्य सोहळ्याच्या सुरुवातीला ऐकवण्यात आला. दरम्यान नागरजन यांचे भाषण झाल्यानंतरही त्यांच्या सूचनेवरून तोच कार्यक्रम ऐकवण्यात आला. कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, मुख्याध्यापक सन्मती देशमाने, राजेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या निबंधक इंदिरा आस्वार यांच्यासह अन्य मान्यवरांनी शाळेला भेटी देऊन अभिवादन केले. समता सैनिक दलाच्या वतीने सकाळी शासकीय कार्यक्रमाच्या पूर्वी शाळेला मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला गेला. यावेळी डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने आसमंत दुमदूमून गेले.