सातारा : सातारा जिल्ह्यात चार मंत्री आणि चार आमदार दोन खासदार महायुतीचे आहेत तरीही दिव्यांग बांधवांच्या समस्या सुटू शकलेल्या नाहीत. आंदोलन करून जनतेला वेठीस धरण्यापेक्षा दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय हनुमंत पवार यांनी पायात चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत दिव्यांगांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत चप्पल त्याग करून भर उन्हात पायाला चटके देण्याच्या या आंदोलनाचे खऱ्या अर्थाने कौतुक होत आहे. पण, सूटबुटात सातारा जिल्ह्यात वावरणाऱ्या अधिकाऱ्यांना निदान दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्याची सुबुद्धी द्यावी. अशी मागणी जनतेतून होत आहे.
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव दिलीप बबन गार्डे शंभर टक्के अंध राहणार पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव व बाळासाहेब रवले राहणार काळोशी मेढा यांना खरोखर घरकुलची गरज असताना पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरकुल चा लाभ मिळाला नाही. लतिका जगताप शंभर टक्के अंध असताना व भूमिहीन असताना ग्रामपंचायतीने जबरदस्तीने तिचे पत्र्याचे शेड उध्वस्त केले. सातारा जिल्हा पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करून निवेदन देऊन कोणतीच कारवाई केली नाही. कल्याणी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल सातारा सयाजी शाळा, अशा अनेक शाळा फी घेत असतात. त्याची चौकशी व्हावी.
दोनशे स्केअर फुट ४९ स्टॉलचे प्रस्ताव मंजूर असताना एकाही दिव्यांग व्यक्तीला जागा दिली जात नाही. दिव्यांग नामदेव महादेव इंगळे येलमरवाडी यांचा 200 चौरस फूट जागा प्रस्ताव जाणीवपूर्वक जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित कार्यालय यांनी चुकीच्या पद्धतीने शासनास सादर केला. २०१६ च्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी.
शैलेंद्र बोर्डे ९० टक्के दिव्यांग असतानाही सातारा सिव्हिल हॉस्पिटलने त्यांना ७३ टक्केवारी दिलेले आहे. असेच अनिल ढेब चालू शकत नसतानाही त्यांनाही ७० टक्के दिव्यांग प्रमाणपत्र दिले. गणेश दुबळे यांचे प्रमाणपत्र चेकिंग साठी दिलेला अर्जाचा आतापर्यंत कोणतेच कारवाई झालेली नाही. पाच महिन्यातून एकदा औंध पुणे टीम सातारा जिल्ह्यात बोलावण्यात यावी.
सिविल हॉस्पिटल मध्ये बऱ्याच शारीरिक तपासणी व शस्त्रक्रिया होत नाहीत. जिल्ह्यातील ससून हॉस्पिटल पाठवतात.
सातारा नॉन स्टॉप गाड्या दिव्यांगांना लाईन मध्ये उभे न करता प्रथम प्राधान्याने तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आलेले आहे. नवरात्र उत्सवात महिला आपल्या मागणीसाठी चप्पल घालत नाहीत. देवी प्रसन्न पावती व मागणी पूर्ण होते. त्यामुळे आता दिव्यांग बांधव अजय पवार यांनीही मागणी पूर्ण करण्यासाठी चप्पल त्याग केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड येथील दिव्यांग हृदय सम्राट माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात दिनांक २१ मार्च पासून सातारचे सुपुत्र अजय पवार यांनी चप्पल त्याग केलेला आहे. त्यांच्या पायाला चटके बसून पायाला फोड आले. तरीसुद्धा ते चप्पल घालणार नाहीत. असा त्यांनी निर्धार केला आहे.
रस्त्यावर आंदोलन करून जनतेला त्रास देऊ नये. कारण सातारा जिल्ह्यातील सर्व मागण्या पूर्ण झालेले आहेत. सातारची जनता सुशिक्षित आहे. सर्व अन्याय सहन करण्याची सर्वाधिक क्षमता सातारकरांची झाली आहे. त्यामुळे मतदार भरघोस मतदान करून सत्ता मिळवून देते. यावर आता आमचा विश्वास असल्यामुळे आम्ही स्वतःला त्रास व्हावा. म्हणून चप्पल त्याग करत आहे. असे अजय पवार यांनी स्पष्ट केले आहे.