सातारा : अनेक अडथळ्यांवर मात करुन आणि पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याने टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती मिळाली आहे. या योजनेसाठी एकूण आठ टीएमसी पाणी आणि 7 हजार 370 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या योजनेचा माण आणि खटावला सर्वाधिक लाभ होणार आहे. सुजलाम, सुफलाम माण - खटाव स्वप्नपूर्तीच्या दिशेने निघाला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह व्हिडिओद्वारे केले. या योजनेच्या पाठपुराव्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी आ. गोरे यांचे तोंडभरुन कौतुकही केले.
विखळे फाटा येथे टेंभू योजनेच्या कामांचा प्रारंभ करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. जयकुमार गोरे, मा. आ. दिलीपराव येळगावकर, अंकुशभाऊ गोरे, सोनिया गोरे, अरुण गोरे, चिन्मय कुलकर्णी, डॉ. संदीप पोळ, शिवाजीराव शिंदे, धनंजय चव्हाण, गणेश सत्रे, टी. आर. गारळे, सुरेशशेठ शिंदे, रामभाऊ देवकर, प्रा. बंडा गोडसे, सिध्दार्थ गुंडगे, सोमनाथ भोसले, विशाल बागल, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आज टेंभू योजनेची कामे सुरु होत आहेत. त्यांनी फेरवाटपातून पाणी आणि निधी उपलब्ध केल्याने योजना पुढे जात आहे. पाणी संघर्ष समितीनेही यासाठी परश्रिम घेतले आहेत. मी जनतेला पाण्याच्या बाबतीत जे-जे शब्द दिले ते पूर्ण करताना राजकीय आणि जनतेची ताकद मिळत गेली. आताही दोन वर्षाच्या आत सर्व कामे पूर्ण करुन टेंभूचे पाणी देण्याचा शब्द मी दिला आहे. औंधसह वीस गावांची योजना राज्यपालांच्या परवानगीनंतर मार्गी लागत आहे. पवारांवर इथल्या जनतेने प्रेम केले. पण त्यांनी जनतेला झुलवत ठेवले. त्यांनी आपल्या भागाला दुष्काळी ठेवायचे पाप केले म्हणूनच जयकुमार नावाचे रोपटे इथे उगवले, वाढले आणि त्यांच्याच मुळावर उठले. गतीशक्ती योजनेत समावेश होवून म्हसवड औद्योगिक वसाहतही मार्गी लागत आहे. ठरलंय वाल्यांनी त्यांचे लवकर ठरवावे. मला रात्रीचे फोन यायला लागले आहेत. त्यांचा उमेदवार जाहीर होताच त्यातील काही माझ्या स्टेजवर दिसतील, असे सांगून आ. गोरेंनी खळबळ उडवून दिली.
शिवाजीराव शिंदे, धनंजय चव्हाण, टी. आर. गारळे, रघुनाथ घाडगे यांनी मनोगत व्यक्त करताना आ. जयकुमार गोरे यांनी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न केल्याने टेंभू योजनेच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात होतानाचा सुवर्णक्षण अनुभवता आला, असे सांगितले.
जयंत पाटील आणि प्रभाकर देशमुख सर्वाधिक खोटारडे : डॉ. येळगावकर
कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे पवारांसह अनेक बडे नेते पाणीच नाही तर देणार कुठून असे विचारायचे. माझे स्वप्न आज जयाभाऊंमुळे पूर्ण होत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीने फक्त झुलवत ठेवले. मायणीचा तत्कालीन लाल दिवा निळा झाला, पण त्यांनी आपल्या भागासाठी कधी पाणी मागितले नाही. जयंत पाटील आणि प्रभाकर देशमुख सर्वाधिक खोटारडे असल्याचेही डॉ. येळगावकरांनी सांगितले.