सातारा : जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडली आहे. पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्या महाबळेश्वरपेक्षाही दुष्काळी फलटण तालुक्यात सर्वाधिक 365.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये 291.2 मि.मी. तर कोरेगाव तालुक्यात 329.7 मि.मी. पाऊस झाला.
जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांत एकूण सरासरी 289 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 50 महसूल मंडलांमध्ये 65 मि.मी. हून अधिक पाऊस झाला आहे. दि. 20 मे ते 28 मे या अवघ्या नऊ दिवसांतील ही आकडेवारी आहे. अचानक आलेल्या पावसाने उन्हाळ्याच्या मे महिन्यातच हा नवा इतिहास घडवला आहे. सातारा जिल्ह्यात यंदा मे महिन्याच्या शेवटी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने विक्रमी नोंद केली आहे.
पारंपरिक पावसाचे आगार मानल्या जाणार्या महाबळेश्वरला यंदा दुष्काळी फलटण तालुक्याने मागे टाकले आहे. अवघ्या नऊ दिवसांत, म्हणजेच दि. 20 मे ते 28 मे या कालावधीत फलटणमध्ये 365.2 मि.मी. पावसाची नोंद झाली असून इतर तालुक्यांच्या तुलनेत ती सर्वाधिक आहे. महाबळेश्वरला 289 मि.मी. पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या या पावसाने नवा इतिहास घडवला आहे.
सातारा जिल्ह्यात 11 तालुक्यांपैकी बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 50 महसूल मंडलांपैकी तब्बल 50 हून अधिक महसूल मंडलांमध्ये 65 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये फलटण तालुक्यातील सर्वाधिक 9 तर त्याखालोखाल खटाव, जावली व पाटण तालुक्यातील प्रत्येकी 6 मंडले आहेत. मे महिन्यासारख्या उष्ण व कोरड्या कालखंडात एवढा पाऊस याआधी क्वचितच झाला होता.
दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्या फलटण तालुक्याने यंदा पावसाच्या बाबतीत सर्व पारंपरिक मानकांना छेद दिला आहे. जिथे पाणीटंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा करणे ही दरवर्षीची समस्या असते तिथे यंदा मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. फलटणसह जवळपासच्या माण, खटाव, कोरेगाव, वाई या तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप हंगामाला चांगली सुरूवात होण्याची चिन्हे आहेत. या पावसाने काही ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले असले तरी सर्वसाधारणपणे हा पाऊस लाभदायक ठरतो आहे.
जिल्ह्याचा खरीप हंगाम जूनच्या दुसर्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकरी बियाणे, खते तसेच औषधांची तयारी करू लागला आहे. निसर्गाच्या अनपेक्षित पण दिलासादायक रुपाने यंदा सातारा जिल्ह्यात नव्या आशा निर्माण केल्या आहेत. महाबळेश्वरच्या ऐवजी फलटणने पावसात आघाडी घेतल्याने हवामान बदलाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या बदलांची गांभीर्याने नोंद घेण्याची गरज पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.