मसापने उभारला पद्मश्री प्रा. वसंत कानेटकरांचा अर्धपुतळा

रहिमतपूर या जन्मगावी रविवारी होणार अनावरण ; मंत्री शिवेंद्रराजेंसह विविध मान्यवरांची उपस्थिती

by Team Satara Today | published on : 30 January 2025


सातारा : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि शाहुपुरी शाखेच्या प्रयत्नातून रहिमतपूर येथे प्रसिध्द नाटककार, लेखक, पद्मश्री प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मगावी त्यांचा अर्धपुतळा उभारुन यथोचित स्मारक साकारण्यात आले आहे. रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी  सकाळी ११ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. वसंत कानेटकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मसाप शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी दिली.

पद्मश्री प्रा. वसंत कानेटकर यांचा जन्म रहिमतपूर येथे झाला. मराठी भाषेतील निसर्ग कवी गिरीश हे त्यांचे वडील होते. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य पुण्यात गेले. उच्च शिक्षण घेत असताना पद्मश्री प्रा.कानेटकरांना वि.स.खांडेकर आणि कन्नड साहित्यिक, तत्कालीन विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य वि.कृ.गोकाक दोन ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभले. मराठीतील गडकरी, फडके, खांडेकर, आपटे, केतकर या लेखकांच्या साहित्याचा आणि पाश्चात्य जगातील इब्सेन, शॉ आणि शेक्सपियर या नाटककरांचा पद्मश्री प्रा.कानेटकरांवर खोलवर प्रभाव पडला. त्यांच्या घर, पंख आणि पोरका या कादंब-या खूप प्रसिध्द आहेत. नाटककार म्हणून त्यांना विशेष प्रसिध्दी आहे. वेड्याचं घर उन्हात  हे त्यांचे पहिले नाटक त्यानंतर एकूण ४२ नाटके त्यांनी लिहिली. प्रेमा, तुझा रंग कसा ?, रायगडाला जेव्हा जाग येते, मत्स्यगंधा, अश्रंूची झाले फुले, लेकुरे उदंड झाली, मला काही सांगायचय आणि हिमालयाची सावली ही विशेष उल्लेखनीय नाटके होत. व्यासांचा कायाकल्प आणि मद्राशीने केला मराठी भ्रतार हे त्यांचे एकांकिका संग्रह आहेत. वेड्याचं घर उन्हात या नाटकास राज्य नाट्य महोत्सवाचे लेखनाचे पारितोषिक मिळाले. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकास राष्ट्रपती पारितोषिक मिळाले.  मराठीतील ऐतिहासिक-पौराणिक नाटकांच्या क्षीण झालेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करुन पद्मश्री प्रा.कानेटकरांनी त्यांना नवे स्वरुप दिले. त्यांची नाटकं मेलोड्रॅमॅटिक असली तरी संवाद सौंदर्यामुळे अनेकांची मने जिंकू शकतात.

त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मसाप, पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्या जन्मगावी अर्धपुतळा बसवण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे श्री. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि मसाप,पुणे शाहुपुरी शाखेच्यावतीने दि.२ फेब्रुवारी रोजी पुतळा अनावरण होणार आहे.

एक वर्षापूर्वी शाहुपुरी शाखेने कविवर्य बा.सी.मर्ढेकर यांच्या घराचे स्मारकात रुपांतर आणि त्याचे लोकार्पण केले होते. आता  रहिमतपूर येथे पद्मश्री प्रा.कानेटकरांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. येणाऱ्या काळात निसर्ग कवी गिरीश यांचे तसेच सातारा जिल्हयातील नामवंत साहित्यिकांचे स्मारक करण्याचा प्रयत्न मसाप,पुणे शाहुपुरी शाखेचा राहणार आहे. शाहुपुरी शाखेने आपल्या वैविध्यपूर्ण कार्याने महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे. शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ॲड.चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत, सदस्य किशोर बेडकिहाळ, डॉ. उमेश करंबेळकर, वजीर नदाफ, आर.डी.पाटील, अमर बेंद्रे, सौ. ज्योती कुलकर्णी, सौ. अश्विनी जठार अतिशय चांगले काम करत आहेत.

  चौंडेश्वर शिक्षण संस्थेचे अरुण माने हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असले तरी ज्यांच्या जागेत संस्थेची उभारणी झाली त्या पद्मश्री प्रा.वसंत कानेटकराबद्दल त्यांना नेहमीच आदर राहिला आहे. पद्मश्री प्रा.कानेटकर यांनी पडीक असलेला राहता वाडा शाळेला दिला. याठिकाणी सध्या कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. पद्मश्री प्रा. कानेटकरांचे वडील कवी गिरीश व स्वत: कानेटकर हे शिक्षक होते. कवी गिरीश यांना पहिला आदर्श राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. पद्मश्री प्रा. कानेटकर यांना आपल्या जागेमध्ये शाळा व्हावी अशी इच्छा होती म्हणून त्यांनी ही जागा संस्थेला दिली. हा वाडा संस्थेला देण्यासाठी कानेटकर यांचे पुतणे प्रा. अरुण कानेटकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.  या जागेत कवी गिरीश यांचे स्मारक संग्रहालय, कानेटकरांच्या आई उमाताई कानेटकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय आहे. ही जागा तेरा गुंठे असून आता या जागेत कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. संस्थेचे संस्थापक अरुण माने हे कानेटकर यांचे कार्य पुढे नेण्याचे काम करत आहेत. त्यांना संस्थेच्या अध्यक्षा सौ. आशा भोसले, उपाध्यक्ष नितीन माने, शिवाजीराव माने, कोषाध्यक्ष शिवाजी शिंदे, सहसचिव किरण भोसले व संस्था सहकार्य करत आहेत. अर्धपुतळ्याचे अनावरण रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आ. मनोजदादा घोरपडे, आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ डॉ.राजेंद्र शेंडे, अरुण कानेटकर, मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस, रवींद्र बेडकिहाळ, धैर्यशील कदम, संपतराव माने, वासुदेव माने, सौ. चित्रलेखा माने-कदम, सचिन बेलागडे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मसाप, पुणे शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, चौंडेश्वरी शिक्षण संस्था, मसाप रहिमतपूर शाखा, उमाताई कानेटकर सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात : मंत्री अतुल सावे
पुढील बातमी
‘म्हाडा’च्या माध्यमातून २ वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार : एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या