सातारा : सातारा तालुक्यातील कण्हेर धरणात मामाबरोबर भाची पोहायला गेली होती. या दरम्यान, भाचीला धरणातील पाण्याच्या लाटांचा अंदाज न आल्याने ती पाण्यात गटांगळ्या खात तिचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवार, दि. ४ मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. आराध्या अवधूत कोरडे वय १0 रा. इस्लामपूर, जि. सांगली असे त्या मृत मुलीचे नाव आहे. या गुन्ह्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इस्लामपूर जि. सांगली येथील आराध्या अवधूत कोरडे (वय १0) ही मुलगी गेल्या चार पाच दिवसांपूर्वी सातारा तालुक्यातील कोंडवे येथील मामा विशाल भाऊ साळुंखे यांच्याकडे शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे आली होती. आज रविवारी सकाळी मामा विशाल साळुंखे यांनी फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार नजिकच्या कण्हेर धरण परिसरात जावूया असं एकमत झालं. त्यामुळे सर्व कुटुंबित कण्हेर धरण परिसरात दुपारी आले. या दरम्यान तीव्र उन्हाने असहाय्य झाले. याचवेळी समोरील कण्हेर धरणात जावून पाण्यात पोहण्याचा आनंद घेवूया असं ठरलं. त्यानुसार मामा, भाची हे पाण्यात उतरुन पोहत होते. यावेळी या धरणातील पाण्याच्या कमी अधिक लाटा किनाऱ्यापर्यंत धडकत होत्या. त्याचवेळी या लाटांमध्ये भाची अचानकपणे पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे दिसले. तिच्या जवळ जाईपर्यंत ती पाण्यात बुडाली. तिचा शोध घेवूनही सापडत नसल्याने मामाने तत्काळ पाण्याबाहेर येवून स्थानिक ग्रामस्थांना साद घातली. यानंतर काहींनी पाण्यात उतरुन तिचा शोध घेतला. ती मुलगी सापडल्यानंतर तत्काळ तिला सिव्हील हॉस्पीटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीचा तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार शिवाजी वायदंडे करत आहेत.