नवी दिल्ली : ईशान्य भारतातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईशान्य भारतात सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी (०१ जून) संध्याकाळी सिक्कीममधील एका लष्करी छावणीत भूस्खलन झाले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून ९ जवान बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, याशिवाय ९ जवानांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (०१ जून) संध्याकाळी ७ वाजता उत्तर सिक्कीममधील चट्टन येथील लष्करी छावणीत भूस्खलन झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले. या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहेत. मृतांची ओळख पटविण्यासाठी आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.
उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे परिस्थिती फार बिकट झाली आहे. लोचन आणि लाचुंग भागात सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत. लाचेनमध्ये 115 आणि लाचुंगमध्ये 1,350 पर्यटक मुक्कामी आहेत. भूस्खलनामुळे दोन्ही बाजूंनी रस्ते बंद झाल्याची माहिती मंगन जिल्ह्याचे एसपी सोनम देचू भुतिया यांनी दिली आहे.
दरम्यान, लाचुंगला जाणारा रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून आजपासून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू होईल. बीआरओ टीमने भूस्खलनामुळे साचलेला ढिगारा साफ केला आहे, खराब झालेले भागांचे बांधकाम करून पुर्ववत करण्यात आले आहेत. फिदांग येथील ‘सस्पेंशन ब्रिज’जवळील भेगा भरण्यात आल्या असून लाचुंग-चुंगथांग-शिप्स्यारे-शांकलांग-डिक्चू रस्त्यावर अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
बीआरओने दिलेल्या माहितीनुसार, सततच्या मुसळधार पावसानंतर, ३० मे रोजी अचानक ढगफुटी झाल्याने उत्तर सिक्कीममध्ये मोठे नुकसान झाले. या काळात, १३० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आणि लाचेन, लाचुंग, गुरुडोंगमार, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि झिरो पॉइंट यासारख्या प्रमुख पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्या, पुलांचे नुकसान झाले आणि डिकू-सिंकलांग-शिपगियार रोड, चुंगथांग-लेशेन-झेमा रोड आणि चुंगथांग-लाचुंग रोड यासारख्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले.