गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात 'छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना' या विषयावरील व्याख्यान

by Team Satara Today | published on : 28 December 2024


सातारा : कसे जगायचे आणि संकटाच्या छाताडावर कसे उभे राहायचे हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र शिकवते. त्यामुळे शिवाजी महाराज हा आमचा भूतकाळ नव्हे, तर वर्तमानकाळ आहे. त्यांना डोळ्यासमोर ठेवा आणि अपयशाला न घाबरता संकटांना धैर्याने सामोरे जा, असे मौलिक विचार प्रेरणादायी वक्ते प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी व्यक्त केले. 

सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमी व खानापूर (जि. बेळगाव) येथील शिवस्वराज जनकल्याण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर येथे आयोजित विसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात 'छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष निरंजन सरदेसाई, गुणवंत पाटील, बी. ए. पाटील, प्रा. डॉ. जे. के. पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 

शून्यातून स्वराज्य निर्माण केलेल्या शिवरायांचे स्मरण हे कोणत्याही संकटातील सर्वात मोठी ताकद आहे. शिवनीती आणि शिवतंत्र ही जगण्याची प्रेरणा आहे. पण आम्ही आमचे आदर्श सांगायला कमी पडत आहोत अशी खंत व्यक्त करून, आपल्या आई-वडिलांचा चांगला मुलगा होण्याचा प्रयत्न करा संदेश प्रा. डॉ. बाबर यांनी यावेळी दिला.

परदेशात नव्या पिढीला राष्ट्रनिष्ठेचा संस्कार देण्यासाठी काल्पनिक पात्रांचा आधार घ्यावा लागतो. पण आपल्याला शिवचरित्रातून शिवरायांच्या अस्सल पराक्रमाचे धडे मुलांना देता येतात. ज्या पिढीला शिवराय कळाले आहेत त्यांची पावले कधीच वाकडी पडत नाहीत असे सांगून, व्यसनांपासून दूर राहून तरुणांनी कर्तृत्वाची कास धरावी असे आवाहन त्यांनी केले.

अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाहीत. या ऐतिहासिक कामगिरीनंतर अवघ्या १८ दिवसात त्यांनी १७ किल्ले जिंकले. काळ आणि वेळेचे उत्तम भान असल्यामुळे ते यशस्वी झाले असे त्यांनी सांगितले. मोबाईलमुळे वेळेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे. ते टाळून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या, स्टेटस ठेवण्यापेक्षा ते निर्माण करण्याची जिद्द बाळगा असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

शिवचरित्रामुळे मनाला उभारी : 

मोबाईलमुळे संवाद कमी झाला आहे. जग जवळ आले असले तरी माणसे दूर गेली आहेत. अशा परिस्थितीत निराश मनाला शिवचरित्र जगण्याची नवी उमेद देते. सर्व काही संपले आहे असे वाटत असल्यास रायगडची भेट आणि शिवचरित्राचे वाचन थकलेल्या मनाला नवी उभारी दिल्याशिवाय राहणार नाही असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उत्तेकर नगर मध्ये 55 हजारांची घरफोडी
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनीला तीन लाखांचा गंडा

संबंधित बातम्या