सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४- २५ या चालू गळित हंगामामध्ये गळीतास येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता रक्कम रु. ३२०० प्रती मे. टन प्रमाणे आदा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी दिली. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला असून कारखान्याने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊसदर देण्याची परंपरा कायम जोपासलेली आहे, असे साळुंखे यांनी म्हटले.
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे कामकाज नियोजनबद्ध आणि पारदर्शकपणे सुरु असून कारखान्याने आजवर अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवलेले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होवून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ऊस विकासाच्या अनेक योजना कारखान्याने राबविलेल्या आहेत. या हंगामामध्ये आता पर्यंत २९ दिवसामध्ये १ लाख ४७ हजार मे.टन ऊसाचे गाळप करुन सरासरी ११.१७ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ४७ हजार ५१० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कारखाना व आसवणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सूरु असून केंद्र शासनाच्या धोरणास प्रतिसाद म्हणून इथेनॉलचेही उत्पादन घेण्यात येत आहे. कारखान्याच्या या हंगामामध्ये ६ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट असून ते साध्य करणेसाठी आवश्यक ती ऊस तोडणी व वाहतुक यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. कारखान्याच्या उद्दीष्ट पुर्ततेसाठी सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला नोंदवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, संचालक मंडळ सदस्य तसेच कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते व अधिकारी उपस्थित होते.