प्रत्येक जिल्ह्यात ‘परशुराम भवन’ उभारणार : आशिष दामले

by Team Satara Today | published on : 24 June 2025


कराड : ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकासाठीच परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी १० लाखांपर्यंत, तर परदेशी शिक्षणासाठी २० लाखांपर्यंत कर्ज प्रस्तावित केले आहे, तर व्यवसायासाठी व्यक्तिगत १५ लाखांपर्यंत, तसेच ५० लाखांपर्यंतचे गट कर्ज आणि महिला बचत गटासाठी २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. परंतु, या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘परशुराम भवन’ उभारण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, अशी माहिती परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

कराड येथे रविवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पश्चिम विभागाचा मेळावा पार पडला. त्या अधिवेशनासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले उपस्थित होते. दामले म्हणाले, ‘महामंडळाच्या स्थापनेपासूनच ब्राह्मण समाजातील शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय या गोष्टी वाढल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. जास्तीत जास्त ब्राह्मण समाजातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता त्यांनी उद्योजक बनावे. इतर ५०/१०० लोकांना त्यांनी नोकऱ्या द्याव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.’

खरंतर आम्ही या महामंडळासाठी शासनाकडे ३०० कोटींची मागणी केली आहे. शासनाने सध्या १० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महामंडळाला लागेल तसा निधी देण्याचा शब्द दिला आहे. त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाचा डेटा मिळवण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटला आम्ही महामंडळाच्या वतीने पत्र दिले आहे. त्यातून राज्यांमध्ये पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणांची माहिती आम्हाला मिळेल. मग खऱ्या अर्थाने काम करणे सोपे होईल. पौरोहित्य करणाऱ्या लोकांसाठी एक वर्षाचा शासनाचा अभ्यासक्रम सुरू करून त्यांना त्याची पदवी देता येईल का? याचाही विचार प्राधान्याने सुरू आहे, असेही एका प्रश्नावर बोलताना दामले यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सडावाघापूरचा उलटा धबधबा सुरू
पुढील बातमी
डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट

संबंधित बातम्या