उत्कृष्ठ कामकाजाबद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

by Team Satara Today | published on : 28 March 2026


सातारा : महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवस कार्यालयीन सेवाविषयक  बाबींमध्ये पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरता 150 दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रम राबवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मूल्यांकन करून गुणांकन करण्यात आले, यामध्ये सातारा जिल्हा परिषदेने 100 टक्के गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्या यादीत स्थान पटकावले. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस हा कार्यक्रम दि. 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये घोषित झाला. तथापि ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीमुळे सदर 150 दिवसाच्या कार्यक्रमास 10 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 

सदर कार्यक्रमाचे मूल्यमापन करून सेवा कर्मी कार्यक्रमांचे गुणांकन करण्यात आले. या गुणांकनामध्ये सातारा जिल्हा परिषदेस 80 पैकी 80 असे 100 टक्के गुण मिळाले आहेत. सदर सेवा कर्मी कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व  आस्थापना विषयक बाबी अद्यावत करणे, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गाच्या पदोन्नतीने नियुक्ती देणे, सरळ सेवा नियुक्ती देणे, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गाच्या बिंदू नामावल्या प्रमाणीकरण करून घेणे, जिल्हा परिषद अंतर्गत  100 टक्के अनुकंपा नियुक्ती करणे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्लॅटफॉर्म  IGOT पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून सदर पोर्टलवरील पाच प्रशिक्षणे पूर्ण करणे व सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे या बाबींचा समावेश होता. 

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव

सदरच्या सन्मानाबद्दल आनंद वाटत असल्याचे सांगून हा पुरस्कार जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमूख, सर्व पंचायत समितींचे गट विकास अधिकारी तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. याचप्रमाणे भविष्यात देखील अशा सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सातारा जिल्हा परिषद शासनामार्फत राबविणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवेल, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आकले गावच्या पोलीस पाटलांची विधवा पत्नी घरकुलापासून वंचित; आठ ते दहा वर्षांपासून प्रतिक्षा पण न्याय नाही
पुढील बातमी
प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर काम करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा गौरव

संबंधित बातम्या