भाजप आदिवासी मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत संघटन बळकटीवर भर; प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळींचे नेतृत्व कौतुकास्पद – रवींद्र चव्हाण

by Team Satara Today | published on : 04 April 2026


मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी मोर्चाची राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील प्रदेश कार्यालयात उत्साहात पार पडली. राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित राहिल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांनी नवनियुक्त आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त केला.

बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, आमदार हरिश्चंद्र भोये, प्रदेश संघटन मंत्री किशोर काळेकर, प्रदेश कार्यालय प्रमुख रवी अनासपुरे, प्रदेश सचिव संतोष जनाठे, माजी आमदार कृष्णाजी गजबे, सुदर्शन शिंदे सदाशिव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत SRI संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच पक्ष बळकटीसाठी आदिवासी समाजाचे संघटन वाढविण्याचा कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला.

प्रास्ताविक करताना आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी मोर्चा अधिक प्रभावी करण्यासाठी गावपातळीवर संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यांनी तरुणांना नेतृत्वात संधी देणे, स्थानिक प्रश्नांवर सक्रियपणे काम करणे आणि शासकीय योजनांची माहिती घराघरात पोहोचवणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच आदिवासी समाजाशी थेट संवाद वाढवून त्यांचा पक्षावरील विश्वास अधिक दृढ करण्यावर त्यांनी भर दिला.

आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके यांनी आपल्या मार्गदर्शनात आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देत या योजनांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यांनी कार्यकर्त्यांनी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, तसेच शासनाच्या कामांची माहिती समाजात पोहोचवून त्यांना पक्षाशी जोडण्याचे काम करावे, असे सांगितले.

नवनियुक्त राज्यसभा खासदार  मायाताई इवनाते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी संसदेत प्रभावीपणे आवाज उठवण्याचा विश्वास व्यक्त केला.

समारोप करताना प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांनी आदिवासी समाजाच्या समस्या समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हे पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांनी समाजाशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

ही बैठक पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली असून आदिवासी समाजाच्या विकासासाठी ठोस दिशा देणारी ठरली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या सभापदीपदांची निवड संपन्न
पुढील बातमी
जिल्ह्यातील धरणांमध्ये सुमारे 50 टक्केच उपयुक्त पाणीसाठा; उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता

संबंधित बातम्या