मुंबई : मुंबईसह इतर राज्यांमध्ये सातत्याने वातावरणात बदल होत आहे. वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मुंबईमध्ये तापमानात झालेले बदल आणि वाढते प्रदूषण इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. मुंबईमध्ये न्यूमोनिया आणि श्वसनमार्गाच्या संसर्गची समस्या प्रामुख्याने आढळून आली आहे. तर अनेकांमध्ये सर्दी, खोकला, ताप इत्यादी अनेक लक्षणे दिसून आली आहेत. साथीच्या आजाराची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ताप आल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये आराम मिळतो मात्र खोकला जाण्यासाठी 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागत आहे. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम फुफ्फुसांच्या आरोग्यासह मानसिक आरोग्यावरसुद्धा दिसून आला आहे.
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, प्रदूषणात वाढ झाल्यामुळे थकवा, मूड स्विंग, आळस, मानसिक ताण इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. हवामानात वाढ झाल्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. खोकला वाढू लागल्यामुळे मास्क लावून फिरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईसह इतर राज्यांमध्ये प्रदूषणात वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. श्वसन संक्रमण हा एक संसर्ग असून याचा श्वसनावर परिणाम दिसून येतो. नाक, घसा, श्वासनलिका, फुफ्फुस आणि श्वासोच्छवासाच्या नळ्या इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. तसेच या विषाणूची लागण संसर्ग जीवाणू, विषाणू किंवा बुरशीमुळे होण्याची शक्यता असते. तसेच हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि प्रदूषणामुळे अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत.
ब्रीच कँडी हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन स्पेशलिस्ट डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितल्यानुसार, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात श्वसनमार्गाच्या संसर्गाची समस्या वाढते. या दिवसांमध्ये वातावरण थंड असते. प्रदूषणातील प्राणघातक कण फुफ्फुसांवर परिणाम करतात. ज्यामुळे अनेकांमध्ये न्यूमोनियाची समस्या दिसून आली आहे. न्यूमोनियाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे 30 टक्के लोकांना कफ आणि खोकल्याची समस्या उद्भवू लागली आहे.तसेच अनेकांना खोकला आणि कफ बरा होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागत आहे.
एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. मनीष छाब्रिया यांनी सांगितल्यानुसार, वाहने, बांधकाम स्थळे आणि कंपन्यांमधून निघणाऱ्या धुरात पार्टिक्युलेट मॅटर आणि विषारी वायूंचे प्रमाण अधिक असते. हा दूषित वायू श्वसन प्रक्रियेद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतो. ज्यामुळे अप्रत्यक्षपणे मेंदूच्या नसांसह शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम होतो. पीएम 2.5 फुफ्फुसांमध्ये जातात. अनेक वेळा रक्तवाहिन्यांमधून डोक्यात पोहोचतात आणि मेंदूच्या पेशींवर परिणाम करतात. प्रदूषणाच्या प्रदीर्घ संपर्कात राहिल्याने नुकसान होते. तसेच याचा परिणाम मानसिक आरोग्यावरसुद्धा दिसून येतो. याशिवाय मायग्रेन ट्रिगर होण्याच्या अनेक कारणांपैकी प्रदूषण हे देखील एक कारण आहे. हिवाळ्यामध्ये काही लोकांना सुस्तपणा जाणवतो. मूड स्विंग्स, ताणतणाव काम करावंसं वाटत नाही, इत्यादी समस्या जाणवतात.