सातारा : महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजनेचे भांडवल करत आहे. त्यातून विरोधी पक्षांना वर आरोप करत आहेत. मात्र आमचे सरकार आल्यास आम्ही लाडकी बहीण योजना अजिबात बंद करणार नाही. उलट नाकारलेल्या बहिणींसह सर्वसमावेशक ही योजना केली जाईल. त्यातून दीड हजार ऐवजी दोन हजार रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे राज्याध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
शिवस्वराज्य यात्रा आज वाई येथे आलेली असताना ते बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, अजित गव्हाणे, महबूब शेख, डॉ नितीन सावंत, विजयसिंह पिसाळ, यशराज भोसले, अनिल जगताप, अभिनेत्री अश्विनी महांगडे, वाई तालुका अध्यक्ष दिलीप बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
महायुती सरकारने त्यांच्या काळात जर खूप काम केले असते तर त्यांना मागील पंधरा दिवसात वेळोवेळी मंत्रिमंडळाच्या मॅरेथॉन बैठका घ्याव्या लागल्या नसत्या. याचा अर्थ त्यांनी मागील त्यांच्या कार्यकाळात काहीही काम केलेले नाही, असा आरोप करून जयंत पाटील म्हणाले, सतत हिंदुत्वाचा गजर करणार्या भाजपाला त्यांच्या जाहिरातीत पुरोगामी हा शब्द वापरावा लागला. हा सर्व महाराष्ट्राचा आणि विरोधी पक्षांचा विजय आहे. भाजपाने महाराष्ट्रात पक्ष फोडायचे नाही तर तोडायचे राजकारण केले. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष तोडले. आता जनता त्यांना तोडल्याशिवाय राहणार नाही.
राज्य शासनाच्या सर्व योजना फसव्या आहेत. त्यांचे शेतकरी युवक कामगार यांच्या प्रश्नांचे अजिबात लक्ष नाही. राज्यात लाडक्या बहिणी अजिबात सुरक्षित नाहीत. दिवसा त्यांचे आमदार पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार करतात, तर त्यांच्या सत्ताधारी युतीच्या माजी आमदारांवर भर चौकात गोळीबार होतो. याचा अर्थ राज्यात कोणतीही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. महायुतीला मतदान करणे म्हणजे त्यांच्या पापात सहभागी होणे आहे. काही वैयक्तिक कारणे सांगून आमच्यातील काही लोक महायुतीमध्ये सामील झाले आहेत, असा आमदार मकरंद पाटील यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावरही पाटील यांनी टीका केली.
शशिकांत शिंदे यांनी आजही सातार्यात शरद पवारांचा मोठा जनाधार आहे यावेळी निवडणुकीत तो दिसून येईल, अशी आशा व्यक्त केली. डॉ नितीन सावंत यांनी मतदारसंघातील अनेक कामे प्रलंबित ठेवून आमदार मकरंद पाटील यांनी जनतेशी दुजाभाव केल्याचे सांगितले. यावेळी अमोल कोल्हे, बाळासाहेब पाटील, महबूब शेख, अजित गव्हाणे, डॉ नितीन सावंत, अनिल जगताप, आदींची भाषणे झाली यावेळी महिला प्रांतात उप राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी अश्विनी महागडे यांची नियुक्ती करण्यात आली. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.