सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना व कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली असून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीमध्ये रणशिंग फुंकले आहे. सर्वसामान्यांच्या विकासाचे प्रश्न घेऊन आणि शेतकर्यांच्या मालाला हमीभाव हे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन सातारा जिल्ह्यात ही तिसरी आघाडी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सातार्यात पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील 225 घराणी आणि त्या घराण्यातील सदस्य आलटून पालटून राज्याच्या सत्तेत येत राहतात. या महायुती आणि महाविकास आघाडी शासनामध्ये माल तोच, पॅकिंग मात्र वेगवेगळे अशी परिस्थिती आहे. या दोन्ही आघाड्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. सर्वसामान्य जनतेला सक्षम तिसरा पर्याय देण्याकरता चळवळीतल्या आम्ही, नेते वामनराव चटप, शंकरराव धोंडगे, संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आली असून त्यांच्या कोअर कमिटीची बैठक गुरुवारी पुणे येथे होत आहे. या बैठकीत महाराष्ट्रात ज्या ठिकाणी सक्षम आणि स्वच्छ चेहर्याचा उमेदवार मिळेल, अशा लढवणार असल्याचे सूतोवाच राजू शेट्टी यांनी केले.
सातारा जिल्ह्यामध्ये कराड दक्षिण, कराड उत्तर, सातारा, माण, कोरेगाव व वाई या सहा विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना व कोअर कमिटी चर्चा करून उमेदवार देणार आहे. हे उमेदवार सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन जनतेच्या समोर जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचे थडगे बांधून विकास करणार आहात का? असा स्पष्ट सवाल राजू शेट्टी यांनी केला. महाविकास आघाडीने भूमी अधिग्रहण अथवा एफ आर पी या संदर्भात चुकीचे निर्णय घेतले. तसेच महायुती सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जनतेशी घेणे देणे नसलेले प्रतिनिधी आहेत. एकीकडे पैशाची लयलूट सुरू असताना दुसरीकडे 3300 कोटी रुपये मुलांच्या शिष्यवृत्तीचे प्रलंबित आहेत. असे सरकार काय कामाचे, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी केला.
परिवर्तन महाशक्ती आघाडी राज्यात शेती उत्पादन, शिक्षण व्यवस्था तसेच राजकीय व्यवस्था यांच्या बदलामध्ये निश्चित क्रांती घडवेल असे सक्षम चेहर्यामधील सरकार देऊ, असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, 25 ऑक्टोबर रोजी 23 वी ऊस परिषद भरवली जाणार असून ऊसदराच्या संदर्भात या परिषदेत चर्चा होईल. गतवर्षी तुटलेल्या उसाला पहिली उचल दोनशे रुपये व यंदाच्या उसाला किती दर घ्यायचा हे यावेळी ठरवले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील कारखानदारीचे साखर उतारे चांगले असताना कारखाने 3500 रुपये पेक्षा जास्त दर देऊ शकत नाहीत, हाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा आहे. कारखान्यांनी जास्तीत जास्त दर द्यावा आणि ते देणे शक्य आहे, असे ठामपणे राजू शेट्टी यांनी सांगितले.