धाड पडताच ५०० च्या नोटांचे बंडल इंजिनिअरने खिडकीबाहेर फेकले

by Team Satara Today | published on : 30 May 2025


भुवनेश्वर  : ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये भ्रष्टाचार विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ग्रामीण विकास विभागातील मुख्य अभियंते बैकुंठनाथ सारंगी यांच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत २.१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. उत्पन्नाहून अधिक संपत्ती जमा केल्याच्या तक्रारीवरून सारंगी यांच्यावर कारवाई करण्यात आली. ज्यात भुवनेश्वर, अंगुल आणि पुरी जिल्ह्यातील मालमत्तेवर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. 

माहितीनुसार, तपास पथकांनी जेव्हा भुवनेश्वर येथील पीडिएन एग्जोटिका इथल्या बैकुंठनाथ सारंगी यांच्यावर फ्लॅटवर धाड टाकली. त्यावेळी सारंगी यांनी ५०० च्या नोटांचे बंडल खिडकी बाहेर फेकले. त्यानंतर तातडीने तिथे असलेल्या पथकांनी त्यांना पकडले आणि फेकलेल्या नोटाही जप्त करण्यात आल्या. भुवनेश्वर इथल्या फ्लॅटमध्ये १ कोटींची रोकड पकडण्यात आली. अंगुल जिल्ह्यातील करदागाडिया येथील दुमजली निवासस्थानातून १.१ कोटी रुपये रोकड सापडली. त्याशिवाय पुरी जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली.

एकूण ८ ठिकाणी टाकलेल्या धाडीत ८ डिप्टी एसपी, १२ निरीक्षक, ६ एएसआय आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता. सारंगी यांच्या कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. अद्यापही छापेमारी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारी कार्यालयाच्या मुख्य अभियंत्याच्या घरासह ८ ठिकाणांवर केलेल्या कारवाईमुळे खळबळ माजली. या कारवाईत २ कोटींहून अधिकची रोकड जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे तपास पथकाचे अधिकारी जेव्हा सारंगी यांच्या घरी पोहचले तेव्हा घाबरलेल्या सारंगी यांनी खिडकीतून पैसे बाहेर फेकले. अधिकाऱ्यांनी बाहेर फेकलेल्या नोटा जमा करत त्याची मोजणी केली.

भ्रष्टाचार विरोधी पथकाने भुवनेश्वर, कटक, पुरी आणि बालासोरसह विविध ठिकाणी धाडी टाकल्या. या तपासात २.१ कोटी रोकड, महागडे इलेक्ट्रिक साहित्य, फर्निचर, मौल्यवान दागिने, जमीन, फ्लॅट संबंधित कागदपत्रे, अनेक बँक खाती आणि लॉकरची माहितीही मिळाली. या कारवाईत ५० हून अधिक अधिकारी उपस्थित होते. २६ पोलीस अधिकाऱ्यांची एक टीम बनवण्यात आली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सरकारी अधिकाऱ्याकडे कशी पोहचली याचा तपास अधिकारी करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नेहमीच अ‍ॅसिडिटी किंवा जळजळ होत असेल तर करा पाण्याचा घरगुती सोपा उपाय
पुढील बातमी
सातारा पालिकेच्या नगर रचनाकारांवर कठोर कारवाई करावी

संबंधित बातम्या