मुंबई : मुंबई आणि परिसरामध्ये वेगाने नागरिकरण होत आहे. पालघर पासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेण पर्यंत नागरिकरण होत आहे. नागरिकरणाचा वेग वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक परिवहनाच्या सेवेतही आधुनिकता आणून बदल करण्याची गरज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत केबल कार चालवण्याचा पर्याय स्वीकारावा लागणार असल्याचे सांगत सरनाईक यांनी यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.
येत्या 7 जानेवारीला नवी दिल्ली येथे “विकसित भारत 2047” या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीस महाराष्ट्राचे परिवहन म्हणून मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मुंबई महानगर क्षेत्रामध्ये “केबल कार” प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकार द्वारे. “पर्वतमाला परियोजना ” अंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारी (PPP) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने रोप वे विकसित करण्याचा मानस व्यक्त केला जाणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर पासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेण पर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकरणाचा वेग वाढत आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर दिवसेंदिवस पडणारा ताण लक्षात घेता भविष्यात “केबल कार” सारखी हवाई सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे असून त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी विशेष परवानगी देणे आवश्यक आहे. या भेटी दरम्यान केंद्रीय मंत्री गडकरी यांना या प्रकल्पाचे सादरीकरण करुन मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात आणून दिले जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, त्या तुलनेत अपुरी रस्ते व रेल्वे सेवा, वाढते प्रदूषण या कारणामुळे काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्चात्य देशातील यशस्वी झालेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
मुंबई महानगरास प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थान, सागरी किनारा खाडीचा प्रदेश, एलिफंटासारखी प्राचीन लेणी, माथेरान सारखे थंड हवेचे पर्यटन स्थळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य यासारखी हरित चादर जतन करून मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी रोप वेच्या माध्यमातून “केबल कार” प्रकल्प राबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. या प्रकल्पाचे महत्त्व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांना पटवून देऊन या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्याची तत्वतः मान्यता घेण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.