सातारा - फलटण शहर परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणार्या टोळीचा प्रमुख अनिकेत सुभाष बनसोडे (वय 22) तसेच टोळीचा सदस्य अर्जुन राजू जाधव (वय 19, दोघे रा. फलटण) यांना सातारा पोलिसांनी सातारा जिल्हा, पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका तसेच सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतून 2 वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहर परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे सराईत टोळीचा प्रमुख अनिकेत सुभाष बनसोडे, तसेच टोळीचा सदस्य अर्जुन राजू जाधव यांच्या टोळीवर दुखापत पोचवणे, विनयभंग करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, चोरी करणे यांसारखे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.
फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा जिल्हा हद्दीतून तसेच पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका हद्दीतून सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतुन 02 वर्षाकरीता हद्दपार करण्याचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे सादर केलेला होता. या प्रस्तावाची चौकशी पोलीस उपअधीक्षक विशाल कृष्णा खांबे यांनी केली.
या टोळीवर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे फलटण शहर व फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. या टोळीला तडीपार करण्याचा आदेश त्यांनी दिला.
याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस फलटण शहर पो.स्टे कडील पो. कॉ जितेंद्र टिके यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.