मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाड्यातील दौऱ्याची आज सांगता झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी यानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीडमधील प्रकारावर भाष्य करताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीड दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून आंदोलन केलं गेलं. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याचा दावा केला गेला. दरम्यान, संजय राऊत यांनी आपला याच्याशी संबंध नाही असं सांगितलं. तर राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले की, माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा संबंध नव्हता, पण त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या प्रकारचं राजकारण करत आहेत.
राज ठाकरे म्हणाले की, तो कालच्या प्रकारातला शिवसेनेचा जिल्हाप्रमुख ओरडत गेला की एक मराठा, लाख मराठा. म्हणजे त्यांना दाखवायचंय की हे जरांगे पाटलांचे लोक आहेत. पण त्यांच्या आडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे. हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. काल जे बीडमध्ये सुपारी फेक प्रकरण झालं त्यात तर शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच होता.
बीडची घटना झाली त्यात तीन पत्रकार सापडले. ही कोणती पत्रकारिता आहे. मी दौरा पूर्ण करून मुंबईला गेल्यानंतर बघेन, काय विघ्न आणतात. काल त्यांनी पाठवलेली माणसं नव्हती. ती कोण माणसं होती ते तुम्हालाही माहितीय. जरांगेंसोबतचे आंदोलनकर्ते नव्हते. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सोबतची माणसं होती असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला.