दहिवडी : पंढरपूरहून सातार्याकडे प्लायवूड घेऊन निघालेल्या टेम्पोने रात्री साडेनऊच्या सुमारास पिंगळी घाटात अचानक पेट घेतला. टेम्पो चालक वैभव युवराज ननावरे (वय 35, रा. भंडीशेगाव, पंढरपूर) याने प्रसंगावधान राखून ट्रक मधून उडी मारल्याने तो बचावला. टेम्पो मात्र जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.
याबाबत घटना स्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांचा मुक्काम असलेल्या पिंगळी खुर्द गावाजवळच घाटात शनिवारी रात्री ट्रकने पेट घेतल्याने खळबळ उडाली. सातारा-लातूर रस्त्यावरील पिंगळी घाटात घडलेल्या या घटनेमुळे रहदारीच्या रस्त्यावर काही काळ वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. ट्रकला लागलेल्या आगीने प्लायवूडनेही पेट घेतला होता. तसेच ट्रकचे टायर फुटल्याने झालेल्या मोठ्या आवाजाने उपस्थितांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. घटनेची माहिती समजताच दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तात्काळ वडूज नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला पाचारण केले.
तसेच घटनास्थळी पोलिस यंत्रणा पोचून तातडीने रस्त्यावरील वाहतूक रोखली. याच दरम्यान अनेकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशामक यंत्रणेला मदत करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे एक तासाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी घाबरलेल्या ट्रक चालक वैभव युवराज ननावरे यांना शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी शेखरभाऊ प्रतिष्ठानची रुग्णवाहिका बोलवून तात्काळ रुग्णालयात हलवले. यावेळी पिंगळी खुर्दचे पोलिस पाटील महेश शिंदे यांच्यासह गोंदवले बुद्रुक व पिंगळी ग्रामस्थांनी मदतकार्य केले. टेम्पो नेमकी कशाने पेटला याचे कारण समजू शकले नाही. टेम्पो व आतील प्लायवूड पूर्ण जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.