सातारा : श्री.छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सातारा जिल्हयाला अनन्यसाधारण महत्व आहे. जिल्हयात अनेक गड किल्ले आहेत परंतु या गड किल्ल्वार अस्वच्छता आहे तसेच दुरवस्था झालेली आहे. गड, किल्ल्याची स्वच्छता करणे, त्याचै सौंदर्य जपणे हे शिवप्रेमींची कर्तव्य असून त्यासाठी जयहिंद गणेशोत्व मंडळ आणि मावळा फौंडेशनने पुढाकार घेतला आहे. या मोहिमेचा प्रारंभ रायगड किल्ल्यापासून होणार असून त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मंगळवारी रवाना झाले.
लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सव सुरु केला तो वारसा साताऱ्यातील जयहिंद गणेशोत्सव मंडळ, जयहिंद व्यायाम मंडळ चालवत आहे. या मंडळाच्यावतीने नेहमीच विविध सामाजिक आणि नाविन्यपूर्ण, समाजाला दिशा देणारे उपक्रम राबवले जातात. मंडळाने आता गड, किल्ल्याची स्वच्छता करण्याचा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला मावळा फौंडेशनचे साथ मिळाली आहे. तरुणाईने शिवाजी महाराजांचा आदर्श घेत त्यांनी निर्माण केलेले गड, किल्ले सुस्थितीत ठेवण्याचा निश्चय करावा तसेच गड, किल्ल्यांचे सौंदर्य अबाधित रहावे यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ही मोहीम प्रत्येक महिन्याला राबवण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याचा प्रारंभ रायगड किल्ल्यापासून होणार असून त्यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मंगळवारी रायगड किल्ल्याकडे रवाना झाले.
याप्रसंगी मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जयहिंद गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वाघमळे, सचिव अनिल जठार, खजिनदार प्रशांत वांकर, बिपीन दलाल, विजय नागर, निलेश पंडित, विशाल धबधबे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विनोद कुलकर्णी आणि मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत मोहिमेला शुभेच्छा दिल्या. प्रत्येक महिन्याला गड, किल्ल्याची स्वच्छता करण्याचा मनोदय याप्रसंगी व्यक्त करत या मोहिमेत तरुणाईने, शिवप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.