कोट्यवधी पाण्यात; सातार्‍यातील नव्या कोर्‍या सर्किट हाऊसला गळती

by Team Satara Today | published on : 21 May 2025


सातारा : सातारा शहरातील जुन्या विश्रामगृहाच्या लगत उभारण्यात आलेल्या नव्या कोर्‍या सर्किट हाऊसला गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गळती लागली आहे. त्यानुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि या इमारतीचे काम केलेल्या ठेकेदाराने शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यामध्ये घातले असल्याचे चित्र समोर आले आहे.

राजकीयदृष्ट्या जागृत असणारा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याकडे पाहिले जाते. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांचाही सातारा जिल्ह्यात राबता असतो. बहुतांश वेळा यांचा मुक्कामही सातार्‍यातील विश्रामगृहामध्येच ठरलेला असतो. गेल्या काही दिवसांपासून सातारा येथील जिल्हा परिषदेच्या पाठीमागे असणारे जुने विश्रामगृह मंत्री, खासदार-आमदार, बडे अधिकारी यांना अपुरे पडत असे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा शहरामध्ये विस्तारित आणि सुसज्ज असे नवे विश्रामगृह असायला पाहिजे, असे बोलूनसुद्धा दाखवले होते. लागलीच यानंतर जुन्या विश्रामगृहाच्या बाजूलाच नवीन विश्रामगृहाचे टेंडर काढून त्याचे कामही सुरू झाले. अल्पावधीत या नवीन विश्रामगृहाचे काम पूर्णही झाले.

अतिशय देखणी वास्तु नवीन विश्रामगृहाच्या रुपाने उभी झाली. मात्र नुकत्याच सुरू झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे या इमारतीची दैना झाली असून, ठिकठिकाणी पावसामुळे गळती सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रवेशद्वारावरच टाकण्यात आलेल्या काचेतून पावसाच्या धारा सुरू झाल्यामुळे अनेकांना आत प्रवेश करताना पावसाचा अभिषेक होत आहे, तर आत मध्ये गेल्यानंतर ठिकठिकाणी गळती सुरू असल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून या नव्या कोर्‍या इमारतीला गळती कशी, असा प्रश्न इथे येणारे अभ्यागत करीत आहेत. दरम्यान जिल्ह्यात कॅबिनेट दर्जाचे चार मंत्री आहेत. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभाग हे खातेच सातार्‍यातील एका मंत्राकडे आहे. असे असताना सातार्‍यातील नव्या कोर्‍या विश्रामगृहाला गळती कशी लागली? असा प्रश्नही आता लोक विचारू लागले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जयस्वालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

संबंधित बातम्या