मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा लाभ जास्तीत जास्त वाहनांना आणि प्रदेशांना व्हावा यासाठी या महामार्गाची जोडणी विविध भूप्रदेशांना दिली जात आहे. समृद्धी महामार्गावरून राजधानी दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून यामुळे मुंबई ते दिल्ली किंवा नागपूर ते दिल्ली हा प्रवास सुलभ होणार आहे.
नागपूर ते मुंबई अशा ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाचे विविध टप्प्यांत लोकार्पण करण्यात आले. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या या रस्त्यामुळे भोवतालच्या १४ जिल्ह्यांमधील वाहतूक सुलभ झाली आहे. सध्या ६२५ किमीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला आहे. अखेरच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किमीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा टप्पाही वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. आमणे येथून मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणारा ४ किमीचा रस्ता बांधला जात आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरून वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाची बांधणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली जात आहे. आमणेपासून ४.२ किमीचा रस्ता पार करून वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गावर येता येईल. येथून पुढे वडोदरा आणि थेट दिल्लीपर्यंत प्रवास करता येईल. यामुळे नागपूरवरून दिल्ली किंवा मुंबईहून दिल्ली गाठणे शक्य होणार आहे.