पाटण : गुरुवारी देशाच्या कानाकोपर्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. त्याचवेळी पाटण तालुक्यातील काळगाव गावाने मृत व्यक्तीच्या रक्षा नदीत अथवा पाण्यात विसर्जित न करता त्या खड्ड्यात पुरून वृक्ष लागवड करण्याचा अभिनव निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार बाळासाहेब पुजारी यांच्या निधनानंतर त्यांची रक्षा पाण्यात विसर्जित न करता ते खड्ड्यात टाकत वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचबरोबर वृक्ष संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त करत काळगाव ग्रामस्थांनी जागतिक पर्यावरणदिनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.
वृक्षारोपण करताना झाडांसाठी लागणार्या मातीत मृत व्यक्तीची रक्षा टाकून त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ नातेवाईकांनी झाड लावावे आणि ते जोपासावे असे आवाहन काळगाव येथील आयडियल फाउंडेशन व कलावैभव गणेश मंडळाकडून करण्यात आले होते. त्याचबरोबर स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यासाठी स्वेच्छेने रोख रक्कम देणगी स्वरूपात द्यावी आणि सुशोभीकरणासाठी आवश्यक साहित्य सुद्धा मदत स्वरूपात द्यावे असे आवाहन काळगाव ग्रामस्थांना करण्यात आले होते.
ग्रामदैवत निनाईदेवी मंदिराचे पुजारी बाळासो पुजारी यांच्या रक्षाविसर्जन विधी पर्यावरण दिनी म्हणजे गुरुवारी होता. यावेळी आयडीयल फाउंडेशनच्या या उपक्रमास प्रतिसाद देत पुजारी कुटुंबीयांनी स्मशानभूमी परिसरात चंदनाचे झाड लावून या झाडांसाठी रक्षा वापरून श्रद्धांजली वाहिली. यावेळी कलावैभव गणेश मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास पाटील, आर. बी. पाटील, भुजंग भांडवलकर, सुनील देसाई उपस्थित होते.
पाटण तालुका गुरव समाज सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष व बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गुरव व आयडीयल फोंडेशनचे अध्यक्ष सूर्यकांत उर्फ राजू काळे यांनी वृक्षारोपण करून स्मशानभूमी सशोभीकरणाचा पुढच्या टप्प्याला सुरुवात केली आहे. बाळासो गुरव हे काळगाव स्मशानभूमीसाठी जमीन दान केलेल्या स्व. रामचंद्र राघू पुजारी यांचे सुपुत्र होत. स्मशानभूमीसाठी जागा दान केल्यानंतर आता जागतिक पर्यावरण दिनी वृक्ष लागवडीसोबत जल प्रदूषण टाळण्यासाठी गुरव कुटुंबांसह काळगाव ग्रामस्थांनी एक नवा आदर्श घालून दिल्याने कौतुक होत आहे.