सातारा : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आ. मनोजदादा घोरपडे यांनी विधिमंडळ अधिवेशनातील पहिल्याच भाषणात मतदारसंघातील दुष्काळावर तोफ डागली. त्यांनी अत्यंत पोटतिडकीने व तळमळीने कराड उत्तरमधील दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले. विधिमंडळात पहिल्यांदाच पोहोचलेल्या आ. मनोजदादांनी विधिमंडळातील एंट्रीतच आपली तडफ दाखवून आगामी वाटचालीतील इरादे स्पष्ट केले.
नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आ. मनोजदादा घोरपडे यांनी मतदारसंघातील जनतेच्या निगडित असलेल्या दुर्लक्षित प्रश्नांवर विधिमंडळाचे लक्ष वेधून घेतले. आ. घोरपडे म्हणाले, कराड तालुक्याच्या पश्चिम भागात दुष्काळी परिस्थिती आहे. तारळी नदीवर 50 मीटर हेडपर्यंत पाल उपसा सिंचन योजना व इंदोली उपसा सिंचन योजना झाल्या. मात्र, या योजनांचे टेस्टिंग झाल्यानंतर 10 वर्षांमध्ये दोन्ही योजना चालू झाल्या नाहीत. येथे शेतकर्यांनी स्वत:च्या लिफ्ट केल्या आहेत तरीसुध्दा या योजना बंद आहेत. दोन्ही योजना या 50 मीटर हेडच्या आहेत. या योजनांचे हेड 50 मीटरवरुन 100 मीटरपर्यंत वाढवल्यास या विभागाचा दुष्काळ कायमस्वरुपी मिटणार आहे. शेती पाण्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे या योजनेचे हेड 100 मीटरपर्यंत वाढवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
आ. मनोजदादा घोरपडे पुढे म्हणाले, नागझरी आणि राजाचे कुर्ले या गावांच्या भोवतीने उरमोडी, टेंभू या योजनांचे पाणी जाते. मात्र, ही दोन गावे दुष्काळाशी सामना करत आहेत. उरमोडी आणि टेंभू योजनेत या गावांचा समावेश करावा. कोरेगाव तसेच तालुक्याच्या पूर्व भागासाठीही पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. शेती पाण्यासोबतच, रेल्वेचे प्रश्न या भागाला सतावत आहेत. या परिसरामध्ये रेल्वे रुळांचे वायडिंग सुरु आहे. किरोली, नडशीतील रेल्वेच्या बोगद्यात पाणी साठत असल्याने त्याचा त्रास शेतकरी व स्थानिकांना होतो. या बोगद्यांमध्ये पाणी साठू नये, याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही आ. घोरपडे यांनी केली.