सातारा : महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाल्याने या निवडणुकीने संसदीय लोकशाही धोक्यात आलेली आहे. भारतीय संविधान धोक्यात आलेले आहे. या निवडणूकांचे निकाल अत्यंत धक्कादायक असून राज्यकर्यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात मंत्रिमंडळ न स्थापता तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री लक्ष्मण माने यानी केली आहे. शिवाय यासाठी त्यांनी कराडच्या प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून उपोषण आंदोलनही छेडले.
दरम्यान उपोषणाच्या संदर्भाने बोलताना उपराकार लक्ष्मण माने म्हणाले की, निवडणूक आयोग, न्यायालय, प्रशासन या सर्वांना हाताशी धरून भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाने कटकारस्थान केले आहे. त्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजय मिळवता आला आहे. वास्तविक त्यांचा हा विजय नाही तर हे पाशवी बहुमत आहे. हा जनतेचा कौल नाही. हा जनादेश नाही तर धनादेश आहे. सुमारे सातशे कोटी रुपयांचा मुद्देमाल निवडणूक आयोगानेच पकडला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैशांचे वाटप करत असताना रंगेहाथ पकडले गेले. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता निवडणूक आयोग शांत बसले. थोडक्यात भारतीय जनता पक्षाने हा खोटा - लबाडीचा विजय मिळवला आहे. पोलिसांच्या संरक्षणात कंटेनर भरून गुजरात मधून पैसे आणून महाराष्ट्राची खरेदी विक्री झाली असेल तर याची न्यायालयाने निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमून तात्काळ चौकशी करावी. तोपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती यांची राजवट लागू करावी. शिवाय निवडून आलेल्या प्रतिधींना व मंत्रिमंडळाला शपथविधी घेऊ देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या महत्त्वपूर्ण मागणी संदर्भात शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली असल्याचे उपराकार यांनी सांगितले. या उपोषणस्थळी रामभाऊ जाधव, राजेंद्र भोसले, रवी गायकवाड, मच्छिंद्र जाधव, बजरंग भोसले यांच्यासह भटक्या विमुक्त जमाती संघटनांच्या पदाधिकार्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या आंदोलनास पाठबळ दिले.