सातारा : आज हा पुरस्कार मी स्वीकारताना पहावयास माझी आई हवी होती, कारण मी संशोधन करत असताना ती नेहमी मला म्हणायची की तू हे जे काम करतोय, पण तुला कोण पुरस्कार देणार? ज्या वेळेला पद्मश्री पुरस्कार सरकारने दिला, त्यावेळीही ती खरोखर हवी होती. आज देशातील भ्रष्टाचार निर्मूलन होणे गरजेचे आहे, कारण या भ्रष्टाचारामुळेच देशाची प्रगती खुंटत आहे. ज्या दिवशी भ्रष्टाचार बंद होईल त्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले असे समजू. वेळेला महत्व द्या. आईने संस्कार केले. भाऊ वडील यांनी सांभाळ केला. जबाबदारीने वागा तर यश तुमचे आहे. मला परिस्थितीने शिकवले आपले जे समोर कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडा, वागण्यात प्रामाणिकपणा ठेवा, नीतिमत्ता राखली तरच यश तुमचे आहे. दुसऱ्याचा चेहर्यावर आनंद ठेवा, समाजासाठी काम करा असे मोलाचे मार्गदर्शन डाॅ.बावस्कर यांनी यावेळी केले.
या वर्षी ट्रस्टने माननीय पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांना त्यांच्या सार्वजनिक आरोग्य व संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन २०२३ चा ‘चिरमुले पुरस्कार’ देऊन गौरविले. यावेळी बोलताना डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनी वरील उद्गार काढले, डॉ. बावस्कर यांना पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम सातारा येथील डाॅ.धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या कै. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात, जेष्ठ डॉ. शरद अभ्यंकर यांच्या शुभहस्ते व कर्मवीर भाऊराव पाटील यूनिवर्सिटी, साताराचे व्हाईस चान्सेलर डॉ..ज्ञानदेव म्हस्के यांचे अध्यक्षतेखाली व रयत शिक्षण संस्था, साताराचे रयत शिक्षण संस्थेचे संघटक डाॅ.अनिल पाटील, डाॅ.सौ.प्रमोदिनी बावस्कर, चिरमुले ट्रस्ट चे विश्वस्त दिलीप पाठक, डॉ.अच्युत गोडबोले, समीर जोशी, डी.जी.काॅमर्स काॅलेज चे प्राचार्य डाॅ.गणेश जाधव यांचे उपस्थिती होती.
या कार्यक्रमात ट्रस्टची ओळख करून देताना दिलीप पाठक यांनी स्व. अण्णासाहेब चिरमुले यांच्या द्रष्टेपणाची ओळखच उपस्थित त्यांना करून दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात अण्णांनी सुरू केलेल्या पाच संस्थांमधून त्यांना विमा महर्षी हा किताब मिळाला. गुंतवणूक योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने केल्यावर संस्था कशा भरभराटीस जातात याचे उत्तम उदाहरण त्यांनी ब्रिटिश सरकारलाही दाखवून दिले. संपूर्ण राज्यात सातारा येथे सर्वप्रथम विमा कंपनी सुरू झाली, हे खरोखरच गौरवपूर्ण असे कार्य आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत 87 व्या वर्षापर्यंत त्यांनी जिद्दीने आपले कार्य करून संस्था निर्मीतीत आणल्या असे सांगितले.
यावेळी बोलताना आपल्या प्रास्ताविक भाषणात डाॅ.अच्युत गोडबोले म्हणाले की, पद्मश्री पुरस्कार विजेत्या डॉ.हिम्मतराव बावस्कर यांच्या कार्याची ओळख संपूर्ण देशातच नव्हे तर जगात झाल्यानंतर त्यांच्या कार्याची माहिती कळली आज ट्रस्टच्या वतीने त्यांना गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
चिरमुले ट्रस्टने यापूर्वी डॉ.कै.मनमोहन सिंग,डॉ.श्री.विजय भटकर,डॉ.अनिल काकोडकर,कै.रतन टाटा,कै.राहुल बजाज,डॉ.सी.रंगराजन,श्री.गुलजार,डॉ.सायरस पूनावाला,डॉ.राजेंद्रसिंह,आदि आदरणीय व्यक्तिना या पुरस्काराने गौरविले आहे.. अशी माहिती भाषणात दिली. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,डॉ.हिम्मतराव बावस्कर हे विख्यात वैद्यकीय संशोधक आहेत. ते विंचू विषबाधेच्या उपचारांवरील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. डॉ. बावस्कर यांच्या कार्यामुळे विंचू दंशविषयी जागरूकता वाढली आहे. त्यांचे कार्य हे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन व सामाजिक सेवा यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. डॉ.हिम्मतराव बावस्कर यांचे ग्रामीण आरोग्य व संशोधन क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी असून, त्यांचे कार्य सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात महत्वपूर्ण ठरले आहे. कोकणात महाड येथे काम करत असताना त्या ठिकाणी नेहमीच विंचू दंश झाल्याच्या घटना घडत व दुर्गम भागात त्यावर उपचार मिळणे कठीण असे. त्यामुळे त्यांनी विंचू दंशाच्या घटनांवर संशोधन करून प्रभावी उपचार पद्धती विकसित केली ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. विंचवाच्या विषामुळे प्रामुख्याने माणसाच्या हृदय व फुफ्फुसावर परिणाम होत असल्याचे त्यांनी शोधले व प्रॅझोसिन या औषधाचा वापर करून विंचवाच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यू दरात मोठी घट केली. त्यांच्या या संशोधनामुळे ग्रामीण भागात अनेकांचे प्राण वाचले. तसेच त्यांनी या औषधाच्या वापराबाबत सर्वांना माहिती करून दिली. जगभरात अनेक ठिकाणीत्यांची सदर उपचार पद्धती मान्य व प्रचलित झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूंवरदेखील लक्ष केंद्रित करून, सरकारने सर्पदंशाने होणारे मृत्यू HIV आणि TBप्रमाणे नोटिफिकेशन करण्यायोग्य बनवावेत आणि सर्पदंशविरोधी विष (ASV) चा योग्य डोस व त्याच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करून ते सर्व डॉक्टरांपर्यंत पोहोचवावे यासंबंधी ते आग्रही आहेत. पद्मश्री पुरस्कार विजेत्या हिम्मतराव बावस्कर यांच्या कार्याची ओळख संपूर्ण देशातच नव्हे तर जगात झाल्यानंतर त्यांच्या कार्याची माहिती कळली. आज ट्रस्टच्या वतीने त्यांना गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
सन्मानचिन्ह व रु.एक लाख असे पुरस्काराचे स्वरूप होते. डाॅ.सौ.प्रमोदिनी बावस्कर यांचा सत्कार साडी देऊन डाॅ.सौ.अनुराधा गोडबोले यांनी केला. यावेळी समस्त सातारकरांचे वतीने कंदी पेढ्यांचा हार घालून डाॅ.बावस्कर यांचा सत्कार केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी या पुरस्काराचा खऱ्या अर्थाने योग्य व्यक्तीला प्रदान करण्याचा हा कार्यक्रम हा खरोखरच आदर्श असा होत आह. चिरमुले ट्रस्टचे कार्य हे दिवसेंदिवस वृद्धींगत होत असून या कार्यात रयत शिक्षण संस्था विविध प्रकारे सहभागी होत आहे, याचा आनंद वाटतो असे सांगितले.
डाॅ.बावस्कर यांनी नावाप्रमाणेच हिंमत दाखवून कार्य केले. त्यांची पुरस्कारासाठीची निवड अगदी सार्थ असल्याचे सांगितले. चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस मधील विद्यार्थ्यांसाठी विविध उपकरणे खरेदीसाठी 25 हजार रुपयांचा देणगीचा धनादेश विश्वस्त समीर जोशी यांनी यावेळी संघटक डॉ.अनिल पाटील यांच्याकडे वितरित केला.
या वेळेला जेष्ठ धन्वंतरी डॉ.शरद अभ्यंकर यांनी, डॉ.बावस्कर यांचा मी स्वतः चाहता असून ते एक रोल मॉडेल आहेत. कारण अनेक डॉक्टर हे संशोधनाच्या फंदात पडत नाहीत. जे डॉक्टर आहेत ते भरपूर पैसा कमावण्याचा उद्देशानेच कार्यरत आहेत. समाजसेवा, गरिबांची सेवा करणारे अगदी किरकोळ असतात. अशा पेशामध्ये कोकणात स्वतःला संशोधनात वाहून घेऊन डॉ.बावस्करांनी अतिशय खूप मोठी गोष्ट करून दाखवली. कोकणासारख्या ठिकाणी अंधश्रद्धाळू, भांडखोर, हट्टी लोक खूप आहेत. ते विंचू चावला तर मांत्रिकाला बोलावतात. देवापुढे नेतात. मात्र जोपर्यंत ते डॉक्टरकडे नेत नाहीत, तोपर्यंत अनेकांचे प्राणोतक्रमण झाल्याचे पाहायला मिळते. अशिक्षित लोकांमध्ये राहून डॉक्टरांनी करून दाखवलेले संशोधनाचे कार्य खूपच गौरवपूर्ण आहे. कोणताही आधार नसताना त्यांनी हे कार्य केले, कारण संशोधनकार्य संस्थेत काम करताना मोठा सपोर्ट किंवा मार्गदर्शन मिळते. आज त्यांचे काम हे सूर्याच्या रथासारखे आहे साधनांवर अवलंबून राहता त्यांनी गुणांवर करून दाखवलेले हे कार्य खरोखरच गौरव पूर्ण असे आहे. सत्कार प्रसंगी पिंपरी-चिंचवडचे काटे, मानकर, धन्वंतरी पतसंस्थेचे वतीने डाॅ.रवींद्र भोसले, सातारा जिल्हा फिजिशियन असोसिएशनच्या डाॅ.शैलजा कापरे आदींनी डॉ. बावस्कर यांचा विशेष सत्कार केला.
या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टच्या व्यवस्थापिका सौ.मानसी माचवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समीर जोशी यांनी केले .
कार्यक्रमास अनिल काटदरे,डाॅ.संदिप श्रोत्री,डाॅ.प्रसन्न दाभोलकर, डाॅ.संजय क्षीरसागर, अशोक गोडबोले, अविनाश लेवे, रमण वेलणकर, डाॅ.सावंत, सौ.अभ्यंकर, डाॅ.सौ.अनुराधा गोडबोले, डाॅ.सौ. शैलजा कापरे,राजेंद्र शेलार, बाबुराव शिंदे, आयएम ए चे प्रतिनिधी ,या कार्यक्रमास उपस्थित होते.