राधानगरीत दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब; 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा

by Team Satara Today | published on : 04 April 2026


राधानगरी : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये राधानगरी वन्यजीव अभयारण्यात दोन प्रौढ नर वाघांचे अस्तित्व असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. STR-07 (रायबा) आणि STR-08 (सरदार) अशी या दोन्ही वाघांची नावे असून, त्यांच्या वास्तव्यामुळे सह्याद्रीचा व्याघ्र भ्रमणमार्ग (Tiger Corridor) सुरक्षित आणि समृद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राधानगरी अभयारण्यात वाघांच्या हालचालींची चर्चा होती. वन विभागाच्या नियमित गस्तीदरम्यान वनकर्मचाऱ्यांना वाघांचे ठसे (पगमार्क्स) आढळून आले होते. त्यानंतर लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रे आणि वैज्ञानिक विश्लेषणाअंती या दोन्ही वाघांची ओळख निश्चित करण्यात आली आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार, हे दोन्ही वाघ पूर्णतः प्रौढ असून त्यांनी आपली स्वतंत्र क्षेत्रे (Territory) प्रस्थापित केली आहेत.

सावंतवाडी-दोडामार्ग ते राधानगरी आणि पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापर्यंतचा भाग हा वाघांच्या स्थलांतरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या भागाबद्दल माहिती देताना मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले की,

"हा भाग वाघांचा अतिशय उत्तम भ्रमणमार्ग आहे. यामुळे वाघांना उत्तरेकडे स्थलांतर करण्यास मोठी मदत होत आहे." तसेच, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी यावर आनंद व्यक्त करताना म्हटले की, "सह्याद्री रांगांमधील वाघांची वाढती संख्या हे व्याघ्र संवर्धनाचे यश आहे. 'रायबा' आणि 'सरदार' (T7 आणि T8) या वाघांमुळे सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वाचा दुवा अधिक मजबूत झाला आहे."

सह्याद्रीच्या जंगलातील 'नऊ' शिलेदार

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि त्याला जोडणाऱ्या राधानगरी परिसरात आता एकूण ९ वाघांचे अस्तित्व असल्याचे समोर आले आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

वाघाचा कोड    नाव    वाघाचा कोड    नाव

T1    सेनापती    T6    हिरकणी

T2    सुभेदार    T7    रायबा

T3    बाजी    T8    सरदार

T4    चंदा    T9    शिलेदार

T5    तारा        

वनविभागाचे विशेष लक्ष

सध्या वनविभागामार्फत या दोन्ही वाघांच्या हालचालींवर, त्यांच्या शिकारीच्या पद्धतीवर आणि पाणवठ्यांच्या वापरावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. 'रायबा' आणि 'सरदार'च्या आगमनामुळे राधानगरी अभयारण्याचे महत्त्व जागतिक स्तरावर अधिक वाढले असून, वन्यजीव प्रेमींकडून या घटनेचे स्वागत होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एका पहाटेने ‌‘संस्कृती‌’ या काळाच्या पडद्याआड ; पतीसोबत मॉर्निंग वॉक करत असताना भीषण अपघातात संस्कृती यांचा जागीच मृत्यू
पुढील बातमी
पर्यटन व्यावसायिक हा सर्वांना आनंद देणारा दुवा की व्यवस्थेचा बळी - अमित कदम

संबंधित बातम्या