सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानावर अजित पवार संतापले

by Team Satara Today | published on : 07 November 2024


बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. त्यामुळे सभा आणि बैठकांचे सत्र देखील वाढले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. त्यामुळे प्रचार सभेला उधाण आले आहे. नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु असून सध्या राजकीय वर्तुळामध्ये सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानाची चर्चा आहे. भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. यावरुन आता अजित पवार यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करुन विधानाचा निषेध केला आहे.

महायुतीमधील नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जहरी टीका करत आहेत. मात्र भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली. सदाभाऊ खोत यांची टीका करताना जीभ घसरली. यामुळे मविआचे नेते आक्रमक झाले आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील अशा खालच्या पातळीच्या वैयक्तिक टीकेवर संताप व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सदाभाऊ खोत यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, आपल्या राज्यामध्ये सुसंस्कृत राजकारण कसं करायचं हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दाखवलं आहे. सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य अतिशय निषेधार्थ आहे. मी त्यांना फोन देखील केला. त्यांना सांगितलं की, हे अजिबात आम्हाला आवडलेलं नाही. हे तुम्ही बंद करा. अशा पद्धतीने वैयक्तिक कोणाच्या बद्दल बोलणं ही आपली पद्धत नाहीच. कोणत्या नेत्याने दुसऱ्या नेत्याबद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे आहे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

पुढे अजित पवार म्हणाले की, तुमची विचारधारा, मत मांडा. पण यावेळी काहीतरी ताळमेळ असला पाहिजे. हा निंदनीय हा प्रकार आहे. हा विनाशकाले विपरित बुद्धी त्यातला हा प्रकार आहे. अशी गोष्ट परत होणार नाही असे सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे. अशा पद्धतीने बोलणं हे चुकीचं आहे. असं बोलून तुम्ही नवीन प्रश्न निर्माण करु नका. वडीलधाऱ्या व्यक्तींबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे महाराष्ट्र सहन करत नाही, आम्ही देखील करणार नाही, असे सदाभाऊ खोत यांना सांगितले असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

“अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे? राज्याची तिजोरी ही गाय आहे. ती गाय शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाहिजे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, चारही थाणे ही वासराचीच आहेत. मी सर्व दूध वासरालाच देणार. मग शरद पवार साहेबांना नऊवा महिना लागला आणि कळा सुटल्या, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. पण राजकीय टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यामुळे आता राजकीय वादंग निर्माण झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
पुढील बातमी
मतदारसंघासातील विकसपर्व अखंडित ठेवण्यासाठी मताधिक्य द्या

संबंधित बातम्या