सातारा : ऐतिहासिक सातारा येथील संगम माहुली येथे छत्रपती थोरले शाहू महाराज, राणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांची समाधी आहे. याठिकाणी लवकरच महाराणी ताराबाई यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासह एकत्रितपणे थोरले शाहू महाराज, राणी येसूबाई यांच्या स्मारकाचे जतन आणि संवर्धन करणे तसेच येथील सर्व मंदिरांची डागडुजी करणे, घाटाची दुरुस्ती व संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करून संगम माहुली एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
सातारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेली वास्तू राज्य संरक्षित स्मारक करणे तसेच महाराणी ताराबाई यांचे संगम माहुली येथे स्मारक उभारणे आणि संगम माहुली परिसर सुशोभित व विकसित करणे यासंदर्भात ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, कोल्हापूर येथील वास्तू अभियंता इंद्रजित नागेशकर, श्रीपाद कुलकर्णी, वन विभागाच्या अदिती भारद्वाज, पुरातत्व विभागाचे अधिकारी एच. व्ही. बारगजे आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत वास्तू अभियंता इंद्रजित नागेशकर यांनी संगम माहुली येथील प्रस्तावित स्मारक जतन व संवर्धनासंदर्भातील तयार केलेल्या आराखड्याची चित्रफीत दाखवून करावयाच्या कामांची माहिती दिली. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर संगम माहुली येथे थोरले शाहू महाराज, राणी येसूबाई आणि ताराबाई यांची स्मारके एकत्रित जतन व संवर्धित करणे तसेच इतरही काही समाधीस्थळांचे संवर्धन करणे, संगम माहुली येथील सर्व मंदिरांची डागडुजी व संवर्धन करणे, पर्यटनवाढीच्या दृष्टीने घाट विकसित करणे, लाईटची व्यवस्था करणे, नदीकाठी होणाऱ्या दशक्रिया विधीसाठीची जागा सोयीसुविधांनी विकसित करणे, वृक्षारोपण करणे, येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे तसेच पार्किंग व्यवस्था करणे, पर्यटकांना विविध सोयी सुविधा निर्माण करणे, स्वच्छतागृह बांधणे, नदीवरून पलीकडे पायी जाण्यासाठी नदीवरील केबल ब्रिजची पुनर्रबांधणी करणे, संपूर्ण परिसर विकसित करून येथील ग्रामपंचायतींना उत्पन्न वाढीचे स्रोत निर्माण करणे आदी निर्णय घेण्यात आले. हा परिसर विकसित करताना ऐतिहासिक धर्तीवर बांधकामे करणे आणि नदीतील पुराच्या पाण्यामुळे बांधकामांना कोणतीही हानी पोहचू नये अशा पद्धतीने बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
दरम्यान, सदरबाजार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान असलेली वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली असून हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींचा आढावा बैठकीत घेण्यात आला. संबंधित जागा मालकाला जागेचा योग्य मोबदला देणे आणि इतर अडचणी दूर करणे याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करा. यासंदर्भात राज्य सरकार स्तरावर बैठक लावून तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
बैठकीत किल्ले अजिंक्यतारा येथे डागडुजी तसेच सुशोभीकरण करणे, किल्ल्यावरील मंदिरांचे जतन व संवर्धन, कार्यक्रमांसाठी छोटेखानी सभामंडप उभारणे, किल्ल्यावर ठिकठिकाणी राज्यातील विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणे, दक्षिण दरवाजाकडील रस्त्याचे दगडी बांधकाम करणे, ठिकठिकाणी लाईटची व्यवस्था करणे आदी विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.