जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ?

शिवेंद्रसिंहराजे, शंभुराज, मकरंद आबा, जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा

by Team Satara Today | published on : 04 December 2024


सातारा : विधिमंडळाच्या नेतेपदी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली असून येत्या गुरुवारी आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहेत. यामुळे सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून उद्याच्या शपथविधी मध्ये पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातून कोण शपथ घेणार, याविषयी चर्चा सुरू आहेत. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे जयकुमार गोरे ही चार नावे चर्चेत असून लाल दिव्याचा मान कोणाला मिळणार, याविषयी जिल्ह्याच्या वर्तुळात प्रचंड राजकीय उत्सुकता आहे.

सातारा जिल्ह्यातून वरील चार आमदारांच्या मंत्री पदाची सुरू झालेली चर्चा थांबायला तयार नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत आठ विधानसभा मतदारसंघात आमदारकीचा झेंडा रोवला आहे. आमदार जयकुमार गोरे यांची चौथी, शंभूराज देसाई व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पाचवी टर्म सुरू झाली आहे. साताऱ्याने महायुतीला भरभरून दिले असल्यामुळे साहजिक मंत्रिपदाची चर्चा होणार, हे उघड आहे. साताऱ्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नावासाठी स्वतः उदयनराजे भोसले यांनी दिल्ली व मुंबई येथे फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे पहिल्या यादीत त्यांचे नाव असणार. फक्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कोणत्या खात्याचा कार्यभार दिला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये माजी गृहराज्यमंत्री व नंतरच्या अडीच वर्षांमध्ये उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते. त्यांना प्रशासनाचा अनुभव असल्यामुळे शिंदे गटाकडून त्यांचीही वर्णी लागणार, यात शंका नाही.

महायुतीमध्ये 20 12 9 असा मंत्रिपदांचा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्मुला मध्ये कोणकोणत्या आमदारांना संधी मिळणार याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी काँग्रेसचा गड खालसा करत पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. तेथे भाजपला ताकद देण्यासाठी कदाचित अतुल भोसले यांच्याही नावाचा विचार केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. आमदार महेश शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरेगावच्या सभेमध्ये मंत्रीपदाचा शब्द दिला होता. त्यामुळे त्यांचाही आग्रह पुढे येऊ शकतो. आमदार जयकुमार गोरे यांनी गेल्या वीस वर्षापासून राष्ट्रवादीला कायमच माण तालुक्यात बॅकफूटवर ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागात भाजपची ताकद अबाधित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस नक्कीच त्यांचा विचार करणार, अशी परिस्थिती आहे. सातारा जिल्ह्यात कॅबिनेट पदाची माळ कोणाच्या काळात पडणार, हा सर्वांसाठी महत्त्वाचा विषय आहे. भारतीय जनता पार्टी ही सीनियरिटीला मानते. मात्र कदाचित यंदा कोणते वेगळे धक्का तंत्र अवलंबले जाणार, याविषयी सुद्धा उत्सुकता आहे. सातारा जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्रीपदाचा विषय तसा तिन्ही घटक पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात महायुतीची ताकत ठेवण्यासाठी या नावांचा विचार वरिष्ठ नेत्यांना करावाच लागणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे
पुढील बातमी
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या

संबंधित बातम्या