सातारा : 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत सातारा पालिकेने एक ते तीन लाख या लोकसंख्या अंतर्गत संपूर्ण विभागात महाराष्ट्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. या अभियानामध्ये वेगळ्या धर्तीच्या विकास संकल्पना,पर्यावरणाचा समतोल राखणे, नाविन्यपूर्ण योजना राबवणे,तसेच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून त्या स्त्रोतांना वापरण्यासाठी उत्तेजन देणे यासारख्या वेगवेगळ्या संकल्पना पालिका प्रशासनाने लोकसहभागातून राबवल्या होत्या. या योजनांची दखल राज्य शासनाने घेऊन सातारा पालिकेला अव्वल दर्जाचे गुणांकन दिले. त्यामुळे पुणे विभागात एक ते तीन लाख लोकसंख्या अंतर्गत सातारा पालिकेला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
या अभियानाचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी मुंबई येथे पार पडला. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते,उपनगराध्यक्ष दत्ता बनकर, पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट, भाजपचे गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक राजू गोरे, उपस्थित होते. मुंबई येथे झालेल्या सत्कार सोहळ्यामध्ये राज्यपाल चार्य देवव्रत यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पंकजा मुंडे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते.
सातारा पालिकेने यापूर्वी सुद्धा माझी वसुंधरा अभियानात सातत्यपूर्ण कामगिरी केली. 2026 मध्ये जास्तीत जास्त लोकसहभागातून कार्बन शून्य वातावरण आणि अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर जल पुनर्भरण यासारख्या विशेष मोहिमा राबवल्या यामुळे पुणे विभागांमध्ये सातारा पालिकेने अव्वल क्रमांक पटकावला. या कामगिरीनिमित्त सातारा पालिकेला सहा कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. या कामगिरीचे खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसेराजे भोसले यांनी अभिनंदन केले आहे.