सातारा : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे,शाहूपुरी शाखा आणि आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन कौशल्य विकसन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मसाप, पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वंदना नलवडे, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ॲड.चंद्रकांत बेबले, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कोषाध्यक्ष सचिन सावंत, वजीर नदाफ, आर.डी.पाटील, अमर बेंद्रे, तुषार महामुलकर त्याचबरोबर शाहूपुरी शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात राजू मुळ्ये यांनी नाटक व एकांकिका लेखन याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये कवी व गझलकार वसंत शिंदे यांनी कविता व गझल लेखन याविषयी मार्गदर्शन केले तर तिसऱ्या सत्रामध्ये निलेश महिगावकर यांनी कादंबरी व संहिता लेखन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी लेखनात कल्पकता व सर्जनशीलता जोपासण्यासाठी आवश्यक टिप्स दिल्या. कार्यशाळेत सहभागी लेखकांना लेखन कौशल्ये विकसित करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग, भाषा विभाग व करिअर गायडन्स विभागाने कष्ट घेतले. प्रास्ताविक डॉ. केशव मोरे यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.विनय धोंडगे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.अर्चना पोरे यांनी केले तर आभार स्मिता पाटोळे यांनी मानले.