सातारा : सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांना पिकविम्याचे अद्याप पैसे मिळालेले नाहीत शेतकर्यांच्या प्रश्नाकडे महायुती सरकार केवळ घोषणा करून दुर्लक्ष करत आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच बैठक मारली. शिवसैनिकांनी कोरेगाव कडे जाणारा रस्ता रोखून धरल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नावर पुरता आक्रमक झाला आहे. सातारा जिल्ह्यातील खाजगी फायनान्स कंपन्यांची मुजोरी शेतकर्यांचे प्रलंबित प्रश्न अशा विविध विषयांवर त्यांनी आंदोलन छेडले आहे. सचिन मोहिते यांच्यासह तालुकाप्रमुख सागर रायते, प्रणव सावंत तसेच इतर सहकारी यांनी पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. शेतकर्यांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत, सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांना विमा हप्त्याचे पैसे मिळाले नाही तसेच शेतकरी सन्मान योजनेचे सुद्धा निधी देण्यात आलेला नाही.
याबाबत सचिन मोहिते म्हणाले, राज्य शासनाने सहा जिल्ह्यातील प्रलंबित पीक विमा साठी दोन हजार कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र सातारा जिल्ह्यात त्याचे वाटप झाले की नाही हे समजायला मार्ग नाही. मागील हंगामात दुष्काळी परिस्थिती असल्याने पिकांना मोठा फटका बसला होता. सातारा जिल्ह्यात बहुतांश शेतकर्यांना पिक विमा अद्याप मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
याशिवाय शेतकरी सन्मान योजना तसेच शेतातील पिकांना कमी मिळणारा हमीभाव यामुळे शेतकर्यांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. उसाला म्हणावा तसा भाव अद्यापही मिळत नाही, अशी तक्रार मोहिते यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको झाल्याने कोरेगाव कडून सातार्याकडे आणि सातार्याकडून कोरेगाव कडे जाणारी दूतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांची समजूत काढली आणि अर्धा तासानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.